नाशिक | Nashik
राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘गोदा ते नर्मदा (Goda to Narmada) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ च्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जलदिंडीचे आयोजन करण्यात आले. ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवीत उत्साहाने जलजागृतीचा संदेश देण्यात आला.
गोदावरी नदीचे (Godavari River) उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन करून शहरातून जलदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी जुना आखाड्याचे महंत हरिसिंग महाराज तसेच आनंद आखाड्याचे अध्यक्ष भगवान बाबा उपस्थित होते. त्यानंतर मंत्री श्री. विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलयात्रेची पालखी टाळ-मृदुंग व ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मार्गस्थ झाली.
या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) आमदार गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर शहरातून प्रारंभ झालेल्या या जलदिंडीचा श्री स्वामी समर्थ गुरूपीठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत (पालखेड), लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश पाटील, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, आचार्य तुषार भोसले यांच्यासह नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि नागरिक, महिला मोठ्या संख्येने या जलदिडींत सहभागी झाल्या.





