मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची आज (दि.२०) मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केले. जेव्हा आमदारांनी विलीनीकरणाच्या संदर्भातील चर्चांवर विचारणा केली, तेव्हा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर सूचक मौन बाळगल्याचे पहायला मिळाले. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमधील आणि नेत्यांमधील संभ्रम पूर्णपणे दूर करण्यासाठी स्वतः शरद पवारांनी या विषयावर आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी, अशी आग्रही इच्छा आमदारांनी बैठकीत व्यक्त केली.
दिवंगत नेते अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करायचे होते, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडून करण्यात येत असताना दुसरीकडे अजित पवारांची नेतेमंडळी हे असे काही सुरूच नव्हते, असा दावा करत होते. मात्र शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, आमच्याकडून विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि त्यांच्याकडून अजित पवार करत होते. मात्र अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्यावर ही चर्चा थांबली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे विलिनीकरणाचा विषय संपल्याचे स्पष्ट केले आहे.
पक्षातील अंतर्गत घडामोडींवर चर्चा रंगत असतानाच, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची ही सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील यावर अधिकृत भाष्य करत, यापुढे विलीनीकरणाच्या अशा कोणत्याही चर्चेला पूर्णविराम असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील यावर अधिकृत भाष्य केले आहे.
विलिनीकरणाचा विषय संपला आहे
शशिकांत शिंदे म्हणाले की, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष उभा करण्याच्या संदर्भात चर्चा होती. अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली आहेत. त्यामुळे मी आता पहिलं स्पष्टीकरण करतो की, विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे. यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीत कुठलीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत.
वास्तविक पाहता, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. याच भेटीमुळेच चर्चेला मोठे उधाण आले होते. त्यातच अजित पवार गटामध्ये सध्या तटकरे आणि पटेल यांच्याविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण असल्याने, आपल्या पक्षाची या विषयावरील भूमिका अगदी स्पष्ट असावी, असा आमदारांचा बैठकीत मुख्य आग्रह होता. शरद पवारांना अनेक नेते भेटायला येत असतात. अनेक वर्षे ते सोबत काम करत आहेत. एखादा नेता भेटायला आला, तर त्या गोष्टीला वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही.
२२ आमदांरांनी शरद पवारांची भेट घेतली
या संपूर्ण घडामोडींदरम्यान सूत्रांकडून अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील जवळपास 22 आमदारांनी आतापर्यंत शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेतली आहे. अजित पवार गटातील अंतर्गत वादांमुळे आणि मतभेदांमुळे तेथील काही आमदार प्रचंड नाराज असून, हे नाराज असलेले आमदार भविष्यात कोणत्याही क्षणी अजित पवार यांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये सामील होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




