नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parisahd Election) महायुतीला (Mahayuti) बंडखोरीचे ग्रहण कायम असून, आज (दि.९) यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीच्या नेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यांचे बंधू अपक्ष उमेदवार गोकुळ गिते अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.
दरम्यान, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी गोकुळ गिते यांना आपल्या वाहनातून मुंबईला चर्चेसाठी नेले आहे. आज (मंगळवारी) होणार्या या चर्चेत गोकुळ गिते निवडणूक लढवणार की, माघार घेणार, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभर मंत्री गिरीश महाजन व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गिते आणि भाजपाचे प्रसाद हिरे यांची मनधरणी केली त्यात हिरे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देऊन निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.
मात्र, अद्याप गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या बंडखोरीवर तोडगा निघालेला नाही. गोकुळ गिते मुंबईकडे रवाना झाले असून, आज या विषयावर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विजयासाठी महायुतीची बंडखोरी थांबवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, सर्वांचे लक्ष आता आजच्या बैठकीकडे लागले आहे.
… तर तो मतदारांसोबतच घात असेल
काल (सोमवारी) दिवसभर चर्चा करूनही मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात अपयश आले. निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचे गिते यांनी महाजन आणि सामंत यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. तसेच मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. त्यावेळी त्यांनी भेटीसाठी बोलावले. यावेळी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चे दरम्यान प्रसाद हिरेंनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असे कळले. तसा पाठिंबा आपण देखील देऊ शकतो का? असे विचारण्यात आले. मात्र, मी मतदारांचा कौल बघता स्पष्टपणे नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल, असे गोकुळ गिते यांनी स्पष्ट केली.




