नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तापमानात होणाऱ्या वाढीसोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात (Rural Area) पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. जलसाठ्यांचे होणारे बाष्पीभवन, भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील (District) ३४० गावे-वाड्यांमध्ये ११८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून दोन लाख ५७४ नागरिकांची तहान भागवली जात आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यात भर म्हणून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
एप्रिलमध्ये अवघ्या तीन गाव व पाड्यांसाठी पाणीटंचाईचा प्रस्ताव होता, मात्र आता तब्बल ३४० गावांमध्ये पाण्याची (Water) भीषण टंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून टंचाई आराखड्यातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात एकूण १०९ गावे व २३८ वाड्या असे एकूण ३४० गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यासाठी प्रशासन ११८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या गाव वाड्यांमधील दोन लाख ५७४ नागरिकांची तहान भागविली जात आहे.
धरणांतील पाणीसाठ्यात घट
जिल्ह्यातील २६ धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील ७ मोठी धरणे व १९ लहान धरणांच्या माध्यमातून २२३११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समूहात ४७.०७ टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जलसाठी चांगला असला तरी उष्णतामानातील वाढ लग्नांची दाट तारीख व पाण्याचा वाढता वापर यामुळे पाणीसाठा वेगाने घटत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून, जिल्हाभरातील धरणांमध्ये वापरायोग्य ३१.५९ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मान्सून वेळेत दाखल न झाल्यास नाशिककरांवर पाणीबाणीची टांगती तलवार कायम आहे.
४७ विहिरी अधिग्रहित
सध्या जिल्हा प्रशासनाने गावांच्या वापरासाठी ३ तर टँकरसाठी जिल्हाभरातून ४७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या विहिरींमधून टँकरद्वारे दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.




