नवी दिल्ली | New Delhi
अंदमान समुद्रात (Andaman Sea) रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांना (Citizen) घेऊन जाणारी एक बोट उलटल्यामुळे लहान मुलांसह सुमारे २५० लोक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे अंदमान बेटावर ( Andaman Islands) राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशातील (South Bangladesh) टेकनाफ येथून निघालेली आणि मलेशियाच्या दिशेने जाणारी ट्रॉलिंग बोट जोरदार वारे, खवळलेला समुद्र आणि क्षमतेपेक्षा जास्त गर्दीमुळे बुडाल्याचे बोलले जाते. याबाबत संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्तालय (UNHCR) ने एका निवेदनात माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे जहाज टेकनाफ येथून निघाले होते, जे चांगल्या संधींच्या शोधात धोकादायक सागरी प्रवास करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांसाठी एक महत्त्वाचे संक्रमण केंद्र आहे. म्यानमारमधील छळग्रस्त मुस्लिम अल्पसंख्याक असलेले हजारो रोहिंग्या, दरवर्षी दडपशाही आणि गृहयुद्धापासून वाचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात आणि अनेकदा तात्पुरत्या बोटींमधून समुद्रातून धोकादायक प्रवास करतात. जहाजावरील अनेक जण बांगलादेशच्या कॉक्स बाजारमधील गर्दीने खचाखच भरलेल्या निर्वासित छावण्यांमधून आले असल्याचे समजते.
तर बांगलादेश तटरक्षक दलाने सांगितले की, ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास चट्टोग्रामहून इंडोनेशियाला जात असताना, बांगलादेशचा ध्वज असलेल्या ‘एमटी मेघना प्राईड’ या जहाजाला अंदमान बेटांजवळ खोल पाण्यात अनेक लोक तरंगताना दिसले. जहाजाच्या (Ship) कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आणि आठ पुरुष व एका महिलेसह नऊ बांगलादेशी नागरिकांना वाचवण्यात यश मिळवले. नंतर, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, वाचवण्यात आलेल्या व्यक्तींना खोल समुद्रात गस्त घालत असलेल्या तटरक्षक दलाच्या ‘मन्सूर अली’ या जहाजाच्या ताब्यात देण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.




