Saturday, July 27, 2024
Homeनगरमहाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड जिंकायचे आहे

महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड जिंकायचे आहे

पंतप्रधान पदाची शपथ घेतली असली तरी जनतेचा कौल होता का? मोदींना सवाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्ये निवडणुका होत आहेत. त्याठिकाणी जनतेचा विश्वास संपादन करून सरकार आणावयाचे आहे, असे आवाहन करत निवडणूक प्रचारात मोदी सरकार, मोदी गॅरंटी म्हणणारे हे सरकार भारत सरकार असल्याचे मतदारांनी दाखवून दिले. पंतप्रधानपदाची मोदी यांनी शपथ घेतली असली तरी त्यांना या पदासाठी देशातील जनतेचा कौल होता का? हे पद घेण्यासाठी जनतेने त्यांना सहमती दाखवली का? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित करत मोदी यांचा समाचार घेतला.

- Advertisement -

नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनासह लोकसभा निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे राज्यातील नूतन आठ खासदार, आमदार, माजी मंत्र्यांसह राज्याच्या कानाकोपर्‍यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. यावेळी पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक काळात मोदी जिथे जातील तेथे हे मोदी सरकार आहे, ही मोदींची गॅरंटी आहे, असे म्हणत होते, पण भारत सरकार म्हणत नव्हते, मात्र आज मोदी सरकार राहिले नाही व मोदी गॅरंटीही राहिली नाही. आजचे सरकार हे भारत सरकार आहे. पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो. देशातील सर्व जाती धर्म व भाषांचा असतो, परंतु हा सन्मान देण्यास मोदी विसरले असावेत किंवा त्यांनी मुद्दाम केले असावे. देशातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी यांना राज्यकर्त्यांनी विश्वास द्यायला हवा, पण मोदी त्यात कमी पडले.

अल्पसंख्याक समाजासह महिलांचे मंगळसूत्र काढून घेऊ, दोन म्हशी असतील तर एक म्हैस नेऊ, असे बोलणे पंतप्रधान पदाला शोभते? मोदींनी कोणत्याही मर्यादा पाळल्या नाही. राजकीय पक्षांवर टीका करताना मर्यादा ठेवली पाहिजे. माझा भटकता आत्मा असा उल्लेख केला, पण आत्मा हा कायम राहतो आणि तो तुम्हाला सोडणार नाही, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली, परंतु ती नकली बापाची संघटना असे बोलणे मोदींना शोभते का? एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी बोलताना तारतम्य त्यांना राहिले नाही. सत्तेसाठी बेफान व अस्वस्थ कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले, असेही पवार म्हणाले. राम मंदिराचा प्रश्न महत्त्वाचा होता का? असा सवाल करून पवार म्हणाले, मी रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाईलही व रामाचा सन्मानही करेल, परंतु राजकारणासाठी रामाचा वापर करणार नाही. मात्र, रामाचा राजकारणासाठी झालेल्या वापराची नोंद अयोध्येतील जनतेने घेतली व भाजपचा तेथे 100 टक्के पराभव केला, असा दावाही पवार यांनी केला.

नवी पिढी उभी करणार
येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंड राज्यात निवडणुका होणार आहेत. या राज्यातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी नवीन पिढी घडवायची आहे व कष्ट करून येथे आपले सरकार आणायचे आहे आणि लोकांना विश्वास द्यायचा आहे, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, देशाला प्रगतीकडे नेताना दलित वर्ग, अल्पसंख्याक, महिला व सामाजिक घटकांच्या हिताची जपवणूक करण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. त्यांना आत्मविश्वास देऊन त्यांची मनापासून सेवा करण्याचे वचन त्यांना देऊ, असे ते म्हणाले.

अष्टप्रधान मंडळासारखे काम
राष्ट्रवादीचे जे आठ खासदार आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळासारखे आहेत. हे महाराष्ट्राचे अष्टप्रधान मंडळ दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे, शेतकर्‍यांचे प्रश्न मांडून जनतेचे हितसंबंध जपतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा कोण आणला ?
नगरमधील विजयाचे श्रेय मी निलेश लंकेना देतो. फक्त मला एकच काळजी आहे व ती म्हणजे दिल्लीतील आमचे जुने सभासद विचारतील हा कोण वेगळा येथे आणला आहे? अशी मिश्किल टिपणी करून पवार म्हणाले, दिल्लीत मराठी बोलता येते. कोणी इंग्रजीतून का बोलेना, परंतु तुम्ही मराठीत, मातृभाषेत, हिंदीत बोलू शकता. फक्त निलेश तेथे मराठीत काय बोलतील, याचा भरोसा नाही अशी टिपणी पवारांनी करताच हशा उसळला.

चुकांवर जाहिरपणे बोल नका- पाटील
मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, माझ्या काही चूका असतील तर त्या शरद पवार यांना सांगा, माझ्या कानात सांगा, मात्र जाहीरपणे त्या बोलू नका. सोशल मीडियावर त्या व्यक्त करू नका. अनेकांनी माझे महिने मोजले; पण आता पुढील चार महिने त्यात लक्ष घालू नका, असे सांगत पक्ष स्थापनेपासून आम्ही पवार साहेबांसोबत आहे. 18 वर्ष सत्तेत काढली. आताही पक्षाने महाविकास आघाडीत सर्वांत कमी 10 जागा घेतल्या आणि त्यातील आठ जागा निवडूण आणल्या आहेत. हे यश मोठे आहे. पुढील चार महिने विधानसभेसाठी सर्वांनी काम करायचे आहे. पुढील काळात नवीन पिढीला संधी देण्यात येणार आहे. पवार बारामतीत गुंतले पाहिले अशी दिल्लीकरांची इच्छा होती. पण निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढणार नाही, ते शरद पवार कसले अशा शब्दात जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या कामाचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या