नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लेक रेवती सुळेच्या लग्नाचे आमंत्रण दिले. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे व्याही अरुण लखानी आणि जावई सारंग लखानीही उपस्थित होते. या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी थेट केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही सहा महिन्यापूर्वीच सरकारला इशारा दिला होता. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार आहेत हे मी, राहुल गांधी आणि इतर विरोधक सांगत होतो. संसदेतील तुम्ही आमची भाषणं काढून पाहा. पण आमचं ऐकलं गेलं नाही. सरकारचं नियोजन नसल्याचं आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, ते आता दिसत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जगात क्रायसिस चाललेय. भारतात इकॉनॉमिक क्रायसिस होऊन आपली आर्थिक व्यवस्था कोलमडेल की काय अशी अवस्था आली आहे. त्या आधी थोडासा जबाबदारपणा दाखवून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली पाहिजे. याबाबत मी पंतप्रधानांना परदेशात जाण्यापूर्वी विनंती केली होती. पंतप्रधानांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक बोलवा. देशात प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे. नियोजनबद्ध प्लानिंग न केल्याने इंधनाचे दर वाढत आहेत. आता फक्त ८ रुपयांचा पहिला टप्पा गाठलाय. पिक्चर अभी बाकी है, ट्रेलर आपण पाहिलाय, असा टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण वाढला; भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर
त्या पुढे म्हणाल्या, “पेट्रोल-डिझेलसाठी सामान्य माणसं रांगेत उभे आहेत. शेतकऱ्यांचीही अवस्था झाली आहे. मंत्री म्हणतात युरिआ मिळणार नाही, मग हे प्रश्न सुटणार कसे? कशाचेही सोंग घेता येते. पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही. ” तसेच राष्ट्रीय संकट उभे राहिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
12 वर्ष या देशाने त्यांना निवडून दिलं. त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण 12 वर्षानंतर देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे? याचे चिंतन त्यांनी केले पाहिजे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या देशात वाढला आहे. शेतकरी अडचणीत आहे. कांदा उत्पादन घेणारा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या पदरात काही पडत नाही. हे प्रश्न सुटणार कसे, असेही त्या म्हणाल्या.




