Wednesday, April 29, 2026
HomeराजकीयNitesh Rane : कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता…; नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश...

Nitesh Rane : कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता…; नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंचं सूचक विधान

मुंबई । Mumbai

कोकणच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने राणे बंधूंच्या राजकीय भूमिकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, या निकालांनंतर आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत माजी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत मालवण आणि कणकवलीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मालवण नगरपरिषदेत निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळवला. दुसरीकडे, कणकवलीमध्ये निलेश राणे यांनी ‘शहर विकास आघाडी’चे उमेदवार संदेश पारकर यांना पाठिंबा दिला होता, ज्यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट टीका केली होती, ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह समोर आला होता.

निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत सूचक पोस्ट शेअर केली आहे. नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,”गप्प होतो…पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. त्यामुळे आता ती वेळ आली आहे,”

नितेश राणे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांनी हा इशारा नेमका कोणाला दिला आहे? स्वतःच्या भावाला की पक्षातील विरोधकांना? याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

मालवणमधील विजयानंतर निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना संयमित प्रतिक्रिया दिली. मालवण आणि कणकवलीतील विजयाचा आनंद व्यक्त करतानाच, त्यांनी कुटुंबातील काही सदस्यांच्या पराभवाबद्दल खंतही व्यक्त केली. राजकारणात हार-जीत होत असते, मात्र कौटुंबिक नाती आणि पक्षाची प्रतिमा महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

दुसरीकडे, सावंतवाडी नगरपरिषद भाजपने आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. या विजयाचे श्रेय युवा नेते विशाल परब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाला दिले आहे. विशाल परब यांनी यावेळी खासदार नारायण राणे यांच्यावरही भाष्य केले. “नारायण राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती देत असल्याने ते माझ्यावर टीका करत आहेत, परंतु मी त्यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोलणार नाही,” असे परब यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गातील या निकालांनी स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलली असून, नितेश राणे आता कोणती भूमिका मांडतात आणि राणे कुटुंबातील हा अंतर्गत राजकीय संघर्ष कोणता वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

ममतादीदींचा पराभव करण्यासाठी मोदी-शाहांनी संपूर्ण यंत्रणा राबवली, संजय राऊतांचा घणाघात

0
मुंबई । Mumbai "निवडणुका जर रणांगणासारख्या लढवल्या जाणार असतील आणि त्यात लोकशाहीऐवजी केवळ दहशतीचा वापर होणार असेल, तर ही लोकशाहीची हत्या आहे," अशा शब्दांत शिवसेना...