Saturday, September 5, 2026
Homeराजकीयनितेश राणेंच्या 'सुवर्णगड' बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; घातपाताचा प्रयत्न?

नितेश राणेंच्या ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; घातपाताचा प्रयत्न?

मुंबई । Mumbai

- Advertisement -

भाजपचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अनोळखी बॅग बराच वेळ पडून होती. बराच वेळ होऊनही ही बॅग कोणीही न घेतल्याने तेथील सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी तातडीने याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली. नितेश राणे यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्याच्या घराबाहेर अशा प्रकारे बेवारस वस्तू आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तातडीने तपास चक्रे फिरवली आहेत.

नितेश राणे हे सातत्याने आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळे चर्चेत असतात. त्यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या घराबाहेर संशयास्पद बॅग मिळणे, हा केवळ एखाद्याचा निष्काळजीपणा आहे की त्यांना लक्ष करण्याचा एखादा घातपाताचा कट होता, या दिशेने पोलीस सध्या तपास करत आहेत.

पोलिसांनी संशयास्पद बॅग ताब्यात घेतली असून तिची सखोल तपासणी केली जात आहे. या बॅगेत नेमके काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, ही बॅग तिथे कोणी ठेवली आणि तो व्यक्ती कोणत्या उद्देशाने आला होता, याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका कॅबिनेट मंत्र्याच्या घराबाहेर असा प्रकार घडणे ही गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे. ही घटना नेमकी काय आहे आणि यामागे कोणाचे षडयंत्र आहे का, हे पोलिसांच्या अधिकृत तपासाअंतीच स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी बंगल्याबाहेरील सुरक्षा वाढवली असून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ सप्टेंबर २०२६ – जेन झीची नवी दिशा

0
भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आजवर अनेक पिढ्या आल्या आणि त्यांनी आपापल्या परीने देशाची दिशा व गती ठरवली. मात्र, आजच्या घडीला देशात एका नव्या, अत्यंत...