मुंबई । Mumbai
मला संधी मिळाली तर मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन, असं मोठं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिरसाट यांना टोला लगावला आहे.
संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. असं म्हणत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिरसाटांना डिवचलं आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते. यावेळी राणे यांनी महायुतीतसगळे खुश आहेत. शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपआपल्या खात्याचं काम सांभाळत असल्याचं सांगत युतीत काही धुसफूस सुरू नसल्याचं स्पष्ट केलं.
नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत हेच एका खासदाराच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राऊतांनी त्यांची लंगोट सांभाळावी, नंतर दुसऱ्याच्या घरात डोकवावे. आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे गटात खदखद आहे. त्यावर संजय राऊतांनी सामानातून लिहावे, असा सल्लाही मंत्री नितेश राणेंनी दिला.
नितेश राणे हे मुस्लिमांबद्दल आक्रमक बोलत असतात, त्यावर विरोधकांनी तुम्ही मंत्री आहात, आता सुधरले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले, सुधारायला मी अजून बिघडलो कुठे? धर्माबद्दल बोलणारे कधी बिघडत नाहीत. आम्ही सुधारलेले आहोत. जे बिघडलेले लोक आहेत. ज्यांना आपला धर्म आणि इस्लाम समजलेला नाही, कुराणमध्ये काय लिहिलय ते समजलं नाही, त्यांची सुधारण्याची वेळ आली आहे. असेही मंत्री राणे म्हणाले.