मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना देखील आक्रमक झाल्या असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून ओबीसी नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलताना लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांच्यावर टीका केली. तसेच संतोष देशमुखांच्या हत्येला मुद्दामून जातीचा रंग दिला जात असून तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता? गुन्हेगारांची जात शोधून जातीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले की,”संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बरोबर पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली. मात्र,महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करण्यात येते. सुरेश धस हे आता मनोज जरांगे यांची भाषा बोलत असून त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारण केले. निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करतो. ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, बीडमध्ये जाळपोळ झाली, त्यावेळी सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का”? असे म्हणत हाके यांनी निशाणा साधला.
तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब तुमच्याच पक्षाचा माणूस गृहविभागावर प्रश्न निर्माण करत आहे. ज्या वाल्मिक कराडचे फोटो धनंजय मुंडेंसोबत आहेत, त्याचे फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांच्यासोबत देखील फोटो आहेत,त्यांना फक्त अडकवले जात आहे.आरोपीला नक्कीच शिक्षा झाली पाहिजे, पण यामागे राजकारण होत आहे. बीड, धाराशिव, जालना आणि परभणीमध्ये दहशतीचे वातावरण असून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे लक्ष सुरेश धस आणि मनोज जरांगे यांनी कमी केले, असा आरोप हाके यांनी केला.
शरद पवारांवरही केली जोरदार टीका
शरद पवार (Sharad Pawar) अंतरवाली सराटीला आले आणि त्यानंतर काय झालं तुम्ही पाहिले.हेच पवार सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटूंबाला भेटायला गेले का? असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच राजकारणाच्या माध्यमातून नेतृत्वाला टार्गेट केले जात असून बहुजन समाजातील लोकांना मंत्रिपद द्यायची नाहीत. त्यांना मुद्दाम टार्गेट करायचे हे सध्या राज्यात सुरु आहे. त्यामुळे सगळ्यांना एकत्र यावं लागेल, तसेच वेळ आली तर रस्त्यावरची लढाई देखील लढावी लागेल, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.