Monday, April 6, 2026
HomeराजकीयChief Election Commissioner : मतचोरीचा मुद्दा तापणार? विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग...

Chief Election Commissioner : मतचोरीचा मुद्दा तापणार? विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

मुंबई । Mumbai

निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. बिहारमधील मतदार यादींचा फेरआढावा आणि कथित मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (१७ ऑगस्ट) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत निवडणूक आयोगाविरुद्धची भूमिका, बिहारमधील मतदार यादीतील वाद आणि आगामी राजकीय रणनितीवर चर्चा झाली. विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडण्याबाबत विचारविनिमय झाला असला तरी, अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे समजते.

बिहारमध्ये मतदार यादी पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट भारतीय जनता पक्षावर “मते चोरल्याचा” आरोप करत निवडणूक आयोगालाही भाजपच्या पाठराखणीत असल्याचे म्हटले. या विधानानंतर विरोधकांची भूमिका अधिक आक्रमक झाली असून, आयोग आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व घडामोडींना उत्तर देताना निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेतली. आयोगाने “मत चोरी”चा आरोप फेटाळून लावत, तो पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले. तसेच, मतदारांनी कुठल्याही भीतीशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले. यापूर्वीही आयोगाने राहुल गांधींकडून त्यांच्या आरोपांबाबत ठोस पुरावे मागितले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून तब्बल ६५ लाख नावे वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून निवडणूक आयोगाला सर्व वगळलेली नावे सार्वजनिक करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार, आयोगाने ही सर्व नावे आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली होती. तथापि, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अन्याय झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत, निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधकांचा संघर्ष थांबण्याऐवजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महाभियोग प्रस्तावाची चर्चा सुरू झाल्याने आगामी काळात संसदेच्या राजकारणात यावरून मोठे वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...