Monday, May 5, 2025
Home Blog Page 10

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींच्या खात्यात १५०० रुपयांचा हफ्ता कधी जमा होणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट

0
लाडक्या

मुंबई | Mumbai
राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार आहे, या संदर्भातील महत्त्वाची अपडेट दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे”.

“पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे”, असेही त्या म्हणाल्या.

 

PM Narendra Modi: “आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

0
झोप

केरळ | Kerala
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यावर होते. त्यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पीएम मोदी यांनी असे विधान केले आहे की, ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना सांगू इच्छितो की, तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत आधारस्तंभ आहात. शशी थरूरही इथे बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार आहे,”असे म्हणत मोदींनी टोला लगावला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
PM मोदी विझिंजम बंदराच्या उद्घाटन समारंभात बोलताना म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री विजयन येथे बसले आहेत. ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूर देखील बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे.” पीएम मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गौतम अदाणी यांच्या नावाचाही उल्लेख केला.

आद्य शंकराचार्यांनी चेतना जागृत केली
मोदी म्हणाले, “आज भगवान आदि शंकराचार्य यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात मला त्यांच्या जन्मभूमीत जाण्याचे भाग्य लाभले. आद्य शंकराचार्य यांनी केरळ सोडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठ स्थापन करून राष्ट्राची चेतना जागृत केली. मी त्यांना अभिवादन करतो.”

केरळला जागतिक सागरी नकाशावर स्थान मिळण्याची अपेक्षा
विझिनजम बंदर सुरू झाल्यामुळे, केरळला जागतिक सागरी नकाशावर एक महत्त्वाचे स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंगमध्ये भारताच्या भूमिकेत एक गेम चेंजर ठरू शकते.

मोदींकडून गौतम अदाणींचा उल्लेख
पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. गौतम अदाणी यांच्या उल्लेख करत ते म्हणाले, “येथे गौतम अदानीही उपस्थित होते. अदाणी यांनी जेवढे चांगले बंदर येथे तयार केले आहे, तेवढे चांगले बंदर तर गुजरातमध्येही तयार केलेले नाही.”

राजकीय प्रतिस्पर्धी अस्वस्थ
काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने म्हटले असले तरी, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.

थरुर यांच्याकडून मोदींची प्रशंसा
रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक चर्चा सुरू ठेवणे. यासह अनेक मुद्द्यांवर थरूर यांनी पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रशंसा केली. यानंतर मोदींनी हे भाष्य केले आहे.

खोल समुद्रातील हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर विकासक अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) द्वारे विकसित केले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप -PPP) मॉडेल अंतर्गत सुमारे 8,867 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला. यशस्वी चाचणी झाल्यानंतर ४ डिसेंबर २०२३ साली या बंदराला व्यावसायिक कमिशनिंग प्रमाणपत्र मिळाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Ajit Pawar: शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांचा उलट सवाल; म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले?

0
शेतकरी

कोल्हापूर | Kolhapur
विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) महायुतीने (Mahayuti) दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करावी अशी मागणी आता सामान्यांकडून होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan) देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण महायुतीची सत्ता येऊन १०० दिवस होऊन गेले असले तरी अद्यापही सरकारकडून कर्जमाफीबाबत काहीही बोलले जात नाही. तर, दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांकडून काही आश्वसनांबाबत सपशेल घुमजाव करत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले, असा थेट उलटसवाल केला. अजितदादांच्या या वक्तव्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महायुती सरकार कर्जमाफीचे आश्वासन पाळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील मंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी पोस्ट X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या या खळबळजनक विधानाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत पवारांनी या मुद्द्याबाबत हात वर केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता त्यावर अजित पवार यांनी उलट सवाल करत “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? मी दिले आहे का? मी तरी दिले नाही!” अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे आता अजित पवारांच्या या विधानामुळे एका नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याने आता लवकरच त्यांच्याकडून कर्जमाफी करण्यात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच याबाबत आश्वासन मी दिलेले नाही, असे म्हटल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा तर येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची सत्ता आल्यास कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. त्याशिवाय लाडकी बहीण योजनेचे मानधन हे १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांकडून या घोषणेवर प्रश्न निर्माण केले. आता, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्याने आता विरोधक आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

संरक्षण मंत्र्यांनंतर आता बिलावल भुत्तोंनी दिली कबुली ; म्हणाले, हो आम्ही दहशतावादी…

0
बिलावल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानकडून दहशतवाद पुरस्कृत केला जाते, असा आरोप भारतासह अनेक देशांनी आजवर केलेला आहे. पाकिस्तानने मात्र कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. मात्र २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानने अमेरिका आणि पाश्चात्या देशांच्या सांगण्यावरून दहशतवादाला खतपाणी घातल्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टोनेही ही बाब मान्य केली आहे. पाकिस्तानचा इतिहास आहे, पाकिस्तानात वाढणाऱ्या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची हत्या केली. मी स्वत: दहशतवादाचा पीडित आहे असे बिलावल भुट्टोने म्हटले आहे.

बिलावल भुट्टो यांनीही एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासमोरही ख्वाजा आसिफ यांना विचारलेला प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, हे काही आता गुपित राहिलेले नाही. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरविली होती. कट्टरपंथी भूमिकेतून आम्ही धडा घेतला आहे. त्यातून अंतर्गत सुधारणाही केली आहे. आता हा सगळा इतिहास आहे. आम्ही आता दहशतवादात सहभागी नाही. देशाने खूप काही भोगले आहे असे त्यांनी म्हटले.

भुट्टो पुढे म्हणाले, “पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिदीनला पाठिंबा देऊन त्यांना निधी पुरवठा केला होता. पाकिस्तानचा यात सक्रिय सहभाग होता. पाश्चात्या देशांसह एकत्र येऊन आणि त्यांच्या साथीने आम्ही हे काम केले. पाकिस्तानात दहशतवादाच्या अनेक लाटा येत राहिल्या. यात आमचेही नुकसान झाले.”

पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादाला पोसले असले तरी आता मात्र परिस्थिती बदलली आहे, असा दावाही भुट्टो यांनी केला. “आज आम्ही दहशतवादाच्या कोणत्याही कृत्यात सामील नाहीत. इतिहासात नक्कीच दुर्दैवाने आम्ही याचा भाग होतो. पण यातून आम्ही काही धडेही शिकलो”, असे भुट्टो यांनी या मुलाखतीत सांगितले.

काय म्हणाले होते ख्वाजा असिफ
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत आम्ही ३ दशकांपर्यंत अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी डर्टी वर्क केले असे विधान केले होते. ही आमची चूक होती, त्याची शिक्षा आम्ही भोगतोय असेही ख्वाजा आसिफ यांनी कबुली दिली होती. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला. या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानात आश्रय दिला जात आहे असा आरोप होतो.ॉ

गुरुवारी मीरपुरखास येथे एका रॅलीला संबोधित करताना बिलावल भुट्टो म्हणाले की, “पाकिस्तानला शांतता हवी आहे. पण भारताने चिथावणी दिली, तर युद्धासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला युद्ध नकोय. पण कोणी सिंधुवर हल्ला केला, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ” पाकिस्तानी नेत्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांचा दुटप्पीपणा दिसून आलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान दहशतीत; PoK मधील पर्यटन स्थळ, मदरसे १० दिवसांसाठी केले बंद

0
मदरसे

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) भारत केव्हाही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमध्ये गेल्या आठवडाभरापासून यु्द्धाची तयारी सुरू आहे. पाकिस्तानने देशातंर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. सायरन बसवण्यात आले आहे. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच धार्मिक मदरसे १० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पाक व्याप्तचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक याने याबाबत संकेत दिले आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सुरक्षेसाठी नीलम खोरे आणि नियंत्रण रेषेजवळ पर्यटनाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पीओके हल्ल्याच्या भीतीने दहशतीत
भारत पीओके भागात केव्हाही हल्ला करु शकतो या भीतीने दहशतीत आहे. हल्ला झाल्यास जेवण, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. युद्ध झाल्यास आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी आपात्कालीन निधी तयार करण्यात आला आहे. जवळपा एक अब्ज रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर पाकव्याप्त परिसरातील सर्व हॉटेल, गेस्टहाऊसचा ताबा पाकिस्तानी लष्कराने घेतला आहे. या वास्तूंच्या मालकांकडून ते बळजबरीने घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आपण सैन्यासाठी या वस्तू सोडत असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात येत आहे.

मदरसे केले बंद
नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या आसपासच्या संवेदनशील भागात असलेले मदरसे १० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून त्यांना लक्ष्य करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि संवेदनशील परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरूनच परत पाठवण्यात आले. लिपा खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ जाण्यास पाकिस्तानी लष्कराने बंदी घातली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Rain Update: दिल्लीत अवकाळी पावसाचा हाहाकार; वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना, अनेकांचा मृत्यू, महाराष्ट्रालाही दिला अलर्ट

0
अवकाळी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली-यूपीमध्ये प्रत्येकी ४ आणि छत्तीसगडमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसासोबत जोरदार वादळीवाऱ्यामुळे झाडे पडण्याचे तसेच घरांचे छप्पर पडण्याच्या घटना दिल्लीत घडल्या आहेत. अशाच एका घटनेत, दिल्लीतील जफरपूर कला भागात एका घरावर झाड पडून या अपघातात ३ मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय, दिल्लीतील छावाला येथे एका घराचे छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहे. यामुळे पुढील चार दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेच्या दाबाचा पट्टा विदर्भातून जात असल्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात शुक्रवारी (ता. 2 मे) आणि शनिवारी (ता. 3 मे) हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, उत्तर भारतात हवामान विभागाने आज राजस्थानच्या ३० जिल्ह्यांमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारी यापूर्वी जयपूर, जैसलमेर, भिलवाडा आणि पाली येथे वादळासह पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाच्या मते, शुक्रवारी मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे गारपीट होऊ शकते. तर राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये धुळीचे वादळ येईल.

आज झालेल्या मुसळधार पावसानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सकाळपासून असे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अर्धी चाके पाण्यात बुडलेली दिसत आहेत. खरंतर, हवामान खात्याने दिल्लीच्या हवामानातील बदलाबाबत आधीच अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने सांगितले होते की, गुरुवारी संध्याकाळपासून दिल्लीत जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. गुरुवारी (१ मे) रात्री दिल्लीत पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी (२ मे) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या भागात जोरदार वारे वाहू लागले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रगती मैदानात ताशी ७८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे दिल्लीतील विविध भागात पाणी साचलेले पहायला मिळाले. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील द्वारका येथील खारखरी कालवा गावात जोरदार वाऱ्यामुळे ट्यूबवेल रूमवर एक कडुलिंबाचे झाड पडले. या अपघातात एका महिलेचा आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला, तर महिलेचा पती जखमी झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

0

अहिल्यानगर | प्रतिनिधी 

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते. या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 

अरुणकाका जगताप यांचं पार्थिव दुपारी २.०० वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर ४. ०० वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते.

 

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

 

Maharashtra News : महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाकाजात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खाती पिछाडीवर

0

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील सरकारी कार्यालयांना (Government Offices) शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन तसेच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम जाहीर केली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन गुरुवारी,महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील गृह, सामान्य प्रशासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, गृहनिर्माण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क या खात्यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळू शकले नाही.

भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत (Quality Council of India) या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा १० निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे. ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.  गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी (All Department) निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८ टक्के ) पूर्णतः साध्य केली आहेत. तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १०० टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे. तर आणखी १८ विभागांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.

या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी पुढीलप्रमाणे, कंसात टक्केवारी दिली आहे.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

ठाणे (९२.००), नागपूर (७५.८३), नाशिक (७४.७३), पुणे (७४.६७), वाशिम (७२.००)

सर्वोत्तम महापालिका आयुक्त

उल्हासनगर (६५.२१), पिंपरी-चिंचवड (६५.१३), पनवेल (६४.७३), नवी मुंबई (६४.५७)

सर्वोत्तम पोलिस आयुक्त

मीरा भाईंदर (६८.४९), ठाणे (६५.४९), मुंबई रेल्वे (६३.४५)

सर्वोत्तम विभागीय आयुक्त

कोकण (७५.४३), नाशिक (६२.२१), नागपूर (६२.१९)

सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक

कोकण (७८.६८), नांदेड (६९.८७)

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

महिला व बाल विकास (८०.००), सार्वजनिक बांधकाम विभाग (७७.९४), कृषी (६६.५४), ग्रामविकास (६३.५८), परिवहन व बंदरे (६२.२६)

सर्वोत्तम आयुक्त / संचालक

संचालक, तंत्र शिक्षण (७७.१३), आयुक्त, जमाबंदी (७२.६६), आदिवासी विकास (७२.४९), राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८), वैद्यकीय शिक्षण (६८.५३)

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

चंद्रपूर (६८.२९), कोल्हापूर (६२.४५), जळगाव (६०.६५), अकोला (६०.५८), नांदेड (५६.६६)

सर्वोत्तम पोलिस अधीक्षक

पालघर (७०.२१), जळगाव (६०.००), नागपूर ग्रामीण (६०.००), गोंदिया (५६.४९), सोलापूर ग्रामीण (५६.००)

या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.

नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी काम करा

या परिवर्तनशील आणि सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यानिमित्ताने केले आहे.

Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; ऐवज जप्त

0

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

घरफोडी (Burglars) करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना नाशिकरोड गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरी (Theif) करण्यात आलेले तीन लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. या चोरट्यानी नाशिक रोड व परिसरात तब्बल चार ठिकाणी घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे.

सिन्नरफाटा (Sinnar Phata) सिटी लिंक रोड परिसरात दोघे संशयास्पदरित्या फिरत आहेत असे समजल्यानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख व विशाल कुंवर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिली. सपोनि प्रविण सूर्यवंशी व पथकाने तत्काळ सिन्नरफाटा येथे धाव घेतली, सिटीलिंक बस डेपोजवळील रस्त्यावर एका रिक्षाजवळ दोन संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे साजिद हसन खान (वय २७, रा. अरिंगळे मळा, साईबाबा मंदिर जवळ, नाशिकरोड) आणि निखील चंद्रकांत पेटाप्ते (क्य २५, रा. विहितगाव, नाशिकरोड) अशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २.८९,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळाले ते पोलिसांनी जप्त केले. सर्व घरफोड्यांचा तपास पोलीस (Police) हवालदार विजय टेमगर करीत आहेत.

Nashik Crime : पोलीस कोठडीतून सराईताचे पलायन; मित्राची मदत, भद्रकाली पोलिसांकडून ताब्यात

0

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक (Arrested) केलेल्या सराईताने मंगळवारी (दि. २९) सायंकाळी अंमलदाराच्या हाताला हिसका देऊन भद्रकाली पोलीस ठाण्यातून (Bhadrakali Police Station) धूम ठोकली. या गंभीर प्रकारानंतर त्याचा शोध सुरु असताना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या मित्रास ताब्यात घेतल्यावर पोलिसांना आवश्यक माहिती मिळाली. यानंतर तांत्रिक विश्लेषणानुसार, भद्रकाली गुन्हेशोध पथकाने ४० किलोमीटर परिसर पिंजून काढत संशयित क्रिश किरण शिंदे (वय १९, रा. ५४ कॉर्टर्स, नानावली, जुने नाशिक) याला घटनेनंतर २४ तासांच्या आत इगतपुरीतून (Igatpuri) ताब्यात घेतले. शिंदे हा सराईत असून त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचे दोनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, याबाबत कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

काठे गल्लीतील (Kathe Galli) जयशंकर चौकातील संगम स्विट्सजवळ रविवारी (दि. २७) रात्री ८ वाजता अमोल हिरवे याच्यावर अज्ञातांनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दगडाने व कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, झोन एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहित यांच्या सूचनेने वरील गुन्ह्यातीस मारेकरी संशयित क्रिश व त्याच्या विधिसंघर्षित मित्रास गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने (दि. २८) ताब्यात घेऊन किंशला अटक केली होती.

या गुन्ह्याच्या पोलीस कोठडीदरम्यान (Police Custody) किश शिंदेला तपासकामी कोठडी बाहेर काढले असता त्याने अंमलदार तौसिफ नियाज सय्यद यांच्या हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनबाहेर उभा असलेला मित्र किरण युवराज परदेशी (रा. कथडा) याच्या मोपेडवर बसून पळ काढला. पथकाने सीसीटीव्ही फूटेज पडताळून परदेशीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने क्रिश शिंदेला रात्री आङगाव शिवारातील निलगिरी बागेत सोडल्याचे सांगितले. त्यानंतर तो कुठे गेला, याची माहिती नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पथकाने क्रिशचा ठावठिकाणा नसतांना मानवी कौशल्य व तांत्रिक तपास करून २४ तासांच्या आत इगतपुरी शिवारातून ताब्यात घेतले, तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते करीत आहेत. ही कारवाई हवालदार सतिष साळुंके, कय्यूम सय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश गुंद्रे, अंमलदार धनंजय हासे, जावेद शेख, गुरू गांगुर्डे, सागर निकुंभ, योगेश माळी, उत्तम खरपडे यांनी केली.

त्या गुन्ह्यातही वॉन्टेड

२४ सप्टेंबर २०२४ रोजी दु‌पारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुणे रोडवरील घंटी म्हसोबा मंदिरामागील प्रो-चिक्न दुकानासमोरील रोडवर हर्षल राजेंद्र देवरे याच्यावर संशयित लखन काशीद, क्रिश शिंदे व त्यांच्या सहा साथीदारांनी ठार मारण्यासाठी धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात २५ एप्रिल २०२५ रोजी अतिविलंबाने गुन्हा दाखल आहे होता. दरम्यान, या गुन्ह्यात मुख्य सराईत शुभम हरगावकरला ताब्यात घेण्यात आले असून क्रिष शिंदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.