Sunday, June 21, 2026
Home Blog Page 3

Nashik Crime News : जप्त केलेली दारू जाते कुठे? उत्पादन शुल्कच्या कारवाईनंतरही मुद्देमालाच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्यात (Nashik District) गेल्या अडीच महिन्यांत १७,३४७ गुन्हे दाखल करत ६२ कोटी सात लाखांचा मुद्देमाल आणि ७७ लाख लिटर दारू (liquor) जप्त केली आहे. दारुमाफियांचे कंबरडे मोडणारी ही कामगिरी कौतुकास्पद असली, तरी या निमित्ताने एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेली ही दारू शेवटी जाते कुठे? आणि तिची विल्हेवाट कशी लावली जाते? कारवाईचे मोठे आकडे मिखले जात असले, तरी जप्त मुद्देमालाची सुरक्षा आणि विल्हेवाटीची संथ कायदेशीर प्रक्रिया हा विभागासाठी नेहमीच डोकेदुखीचा आणि दुर्लक्षित भाग ठरतो आहे.

अडीच महिन्यात जप्त केलेला ६२.०७ कोटींचा साठा खटले निकाली निघेपर्यंत ‘मुद्देमाल कक्षात’ साठवून ठेवावा लागतो. अनेकदा जागा अपुरी पडल्याने हा साठा असुरक्षित राहतो. या साठ्यातून होणारी छुपी गळती किंवा चोरीच्या शक्यता यावर कडक पाळत ठेवणे हे अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. या मोहिमेत एकूण ६७९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोर्ट केसेस वर्षानुवर्षे चालत असल्याने ही वाहने उत्पादन शुल्क कार्यालयाच्या आवारात ऊन-पावसात सडत पडतात.

कोट्यवधी रुपयांची (Money) ही वाहने वेळेत लिलावात न काढल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होतेच शिवाय कार्यालयांच्या आवाराला भंगार बाजाराचे स्वरूप येते. अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी विभागाने १८००२३३१९१९ हा टोल-फ्री क्रमांक दिला आहे. परंतु वर्षाला २५ हजार कोटींचा महसूल देणाऱ्या या विभागाकडे स्वतःची भक्कम गुप्तचर यंत्रणा का नाही? जनतेने माहिती दिल्याशिवाय दारुमाफियांचे अड्डे उद्ध्वस्त करता येत नाहीत का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

विल्हेवाटीची संथ प्रक्रिया

नियमानुसार, घातक रासायनिक गावठी दारू थेट ओतून नष्ट केली जाते. मात्र, परराज्यातून तस्करी करून आणलेली बनावट नसलेली पण विनापरवाना असलेली ब्रँडेड दारू नष्ट करताना किंवा तिचा लिलाव करताना मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या व अधीक्षकांच्या मंजुरीअभावी हजारो लिटर दारूचा साठा वर्षानुवर्षे पडून राहतो.

आधुनिक किटची सद्यस्थिती काय?

ताडीमधील भेसळ अवघ्या दोन मिनिटांत ओळखणारी आधुनिक किट विभागाने उपलब्ध केली आहे. तंत्रज्ञानाचा हा वापर नक्कीच चांगला आहे, मात्र ही किट केवळ मुख्यालयात शोभेची वस्तू बनली आहे की नाशिकच्या ग्रामीण व दुर्गम भागातील तपासणी पथकांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचली आहे, हा गंभीर विषय आहे.

जप्त मद्याचा ‘ब्रँड’ वाईज हिशेब (लिटरमध्ये)

गावठी दारू : २,९४,४५४ लिटर
देशी दारू : २,०२,६१३ लिटर
वाईन आणि बिअर : २८,३९,५४३ लिटर
स्पिरीट आणि रसायन : ७,१३६ लिटर (स्पिरीट) व ४३,४८,३६३ लिटर (रसायन)
स्कॉच : ४०४ लिटर

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल खासदार ओमराजेंच्या विरोधात; फडणवीस आणि शिंदेंची तातडीने अमित शाहांसोबत चर्चा, काय ठरलं?

0

मुंबई | Mumbai

गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) यांच्यासह नऊ जणांची पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यामुळे ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्यासाठी तयार असणारे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे या प्रकरणी वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी म्हटले आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा निकाल आपल्या बाजुने लागल्यानंतर ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपला पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणी आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाल येताच चर्चा केली. या निकालाची सर्व माहिती शाह यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सीबीआयला या प्रकरणी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिल्याचे समजते.तर या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की, “पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज कोर्टाचा निकाल आला. सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कारण पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासह दोन लोकांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हे अतिशय गंभीर प्रकरण होते. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळेल असा विश्वास कुटुंबिय आणि इतरांना होता, मात्र दुर्दैवाने विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी मी स्वत: आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात जाऊन अपील करा आणि केस लढवा, असे निर्देश अमित शाह यांनी सीबीआयला दिले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या चर्चांवर बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की,”मी मतदारसंघात जाणार असून कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन पुढील दोन दिवसांनी पक्षांतराबाबत निर्णय घेईल”, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरमधून माघार घेतली तर पक्षांतर करण्यासाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांशचा आकडा गाठणं शिंदेंसाठी अशक्य होणार आहे. परिणामी हे ऑपरेशन फेल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर मतदारसंघात जाऊन काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला; म्हणाले, “सत्तेसाठी करोडोंची उधळपट्टी, अमित शहा २०२९ ची…”

0

मुंबई | Mumbai

देशात आणि महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, ‘नीट’सारख्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत, मुली पळवल्या जात आहेत. एवढे गंभीर प्रश्न देशासमोर असताना आमच्याकडे मात्र काय चाललंय? तर आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडणे! सत्ता टिकवण्यासाठी वाटेल तितके पैसे मोजायला हे तयार आहेत, माणसे विकली जात आहेत, अशा तीव्र शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या (MNS) विशेष मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख करत खळबळजनक दावा

ठाकरे गटाचे खासदार भाजपऐवजी शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या नावाचा उल्लेख करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की, “अमित शहा हे आत्तापासूनच २०२९ ची स्वतःसाठी तयारी करत आहेत,” असा थेट दावा राज ठाकरेंनी केला. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

५०-१०० कोटींसाठी विकल्या जाणाऱ्यांना पुन्हा निवडून देणार का?

राज ठाकरेंनी जनतेला आणि मतदारांना थेट सवाल करत अंतर्मुख होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्यासाठी तुम्ही उन्हातान्हात दोन-दोन, तीन-तीन तास रांगेत उभे राहता, तो माणूस जर पन्नास-शंभर कोटींसाठी विकला जात असेल, तर जनता म्हणून तुमची प्रतिक्रिया काय? स्वाभिमान गेला की उरतात फक्त जिवंत प्रेत! आज भारतीय जनता पक्षाकडून हे सुरू आहे, उद्या दुसरा पक्ष करेल. या पळवापळवीच्या राजकारणात आपण महाराष्ट्राचे अस्तित्व, स्वाभिमान आणि परंपरा विसरून चाललो आहोत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

देश गंभीर संकटात, पण सत्तेसाठी करोडोंची उधळपट्टी!

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी देशातील वाढत्या आत्महत्यांच्या आकडेवारीचा अहवाल मांडला. ते म्हणाले की, लहान मुले आणि मुली पळवून त्यांचे व्यापार केले जात आहेत. त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवले जात आहे. हे सगळे प्रश्न आ वासून उभे असताना, सत्ताधाऱ्यांना फक्त आपली खुर्ची टिकवायची आहे. तुमच्या मताची किंमत आज शून्य झाली आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर टोला लगावताना ते म्हणाले की, हे सगळं ऐकलं तेव्हा वाटलं, बरं झालं आपला खासदार निवडून नाही आला, असे त्यांनी सांगितले.

…तर आंदोलन मतपेटीपर्यंत पोहोचवा!

मनसे सैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, नुसती वरवरची आंदोलने करून चालणार नाही. जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तर सत्तेचा मार्ग मतदार यादीतून जातो. आज आपली आंदोलने लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा असेल, तर आपल्या हातात सत्ता असायला हवी, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.

काही मुनी भाजपच्या दावणीला

मुंबईत ठिकठिकाणी जैन मुनींकडून पांढरे पट्टे मारले जात आहेत, यावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले की,संपूर्ण जैन समाज असा नाही, वर्षानुवर्षे अनेक जैन लोक इथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. प्रत्येक धर्माविषयी आणि उत्तम काम करणाऱ्या मुनींबद्दल मला आदर आहे. पण काही जण जे आहेत, त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी (दावणीला) लागले आहेत. तिथून ते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून तुम्हाला (जनतेला) मूळ प्रश्नांवरून भरकटवून अशा वादात अडकवून ठेवता येईल, असा थेट आरोप त्यांनी केला. एका मुनींचा उल्लेख करत, तो एक जण आहे, त्याला मुनीही म्हणत नाहीत, कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरतो, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

Pawanraje Nimbalkar Case : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

0

मुंबई | Mumbai

राज्यातील राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड (Pawanraje Nimbalkar Case) प्रकरणाचा निकाल आज (शनिवारी) तब्बल २० वर्षांनी देण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. यावेळी न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर सर्व आरोपींना दोषी ठरवू शकत नाही, असे म्हटले आहे.

या प्रकरणाचा निकाल वाचनाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) आणि खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) आपल्या कुटुंबियांसोबत कोर्टात हजर होते. निकालाची भिस्त माफीच्या साक्षीदारावर अवलंबून असताना त्याच्या जबाबाच्या बाबतीतच संदिग्धता आहे, माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही, असं निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं. विशेष सीबीआय न्यायालयाचे (CBI Court) न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी निकाल दिला.

न्यायमूर्ती काय म्हणाले?

निकाल वाचन करताना न्यायमूर्ती म्हणाले की २००२ पासून पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली. पवनराजेंनी २००३ मध्ये आपल्या जिवाला धोका असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आम्ही १२७ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर अवलंबून आहे. साक्षीपुराव्यांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव येथील काही जणांचा समावेश आहे. जैन यांना १५ दिवस मारहाण करुन जबाब घेतला, त्याची औषधं बंद केली, हे अयोग्य आहे. ८ सप्टेंबरला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना २५ सप्टेंबरला अटक (Arrested) केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. पोलिसांच्या तपासात विसंगती आहेत, असं न्यायमूर्ती म्हणाले.

पोलिसांची घोडचूक, तपासाचा पायाच ठरला ठिसूळ

न्यायालयाने (Court) निकालपत्रात नमूद केले की, सरकारी पक्षाचा हा संपूर्ण खटला माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर उभा होता. मात्र, तपास यंत्रणांनी इथेच सर्वात मोठी चूक केली. गुन्हे शाखेने त्याला ८ सप्टेंबर २००९ रोजी मुंब्रा येथून ताब्यात घेतले, पण त्याची अधिकृत अटक २५ सप्टेंबर दाखवली. या दरम्यान त्याला १५ दिवस बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण करण्यात आली आणि औषधे बंद करून त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला. हा पहिला जबाब कायद्याला धरून नव्हता. सरकारी पक्षाने ही माहिती न्यायालयापासून लपवून मोठी घोडचूक केली, ज्यामुळे जैनचा पुरावा संशयाच्या खाईत ढकलला गेला. त्याच्या दोन्ही जबाबांमध्ये मोठी तफावत आढळली आहे.

५० हजारांसाठी हत्या? हे पटणारे नाही

माफीच्या साक्षीदाराने पैशांच्या नडणुकीमुळे हा गुन्हा केल्याचा दावा केला होता, जो न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला. न्यायमूर्ती म्हणाले, “साक्षीदाराचे मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल आहे. अशा श्रीमंत पार्श्वभूमीच्या माणसाने केवळ ५० हजार रुपयांसाठी एवढी मोठी हत्या केली, हे अजिबात पटणारे नाही. त्याला सोयीनुसार खोटे बोलण्याची सवय आहे”, असे न्यायालयाने म्हटले.

तपासातील सर्वात मोठी त्रुटी: मोबाईल जप्त नाही, CDR गायब!

न्यायालयाने सीबीआय आणि पोलिसांच्या (Police) तपासातील तांत्रिक त्रुटींवर कडाडून टीका केली. तपास यंत्रणांनी डिजिटल पुराव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. खटल्याचा तपास करताना एकाही आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला नाही.आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) काढले गेले नाहीत. जप्ती पंचनाम्यात आरोपींच्या खिशात काय सापडले याची साधी नोंदही नाही. जर सीडीआर काढले असते, तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते की नाही हे स्पष्ट झाले असते.घटनाक्रमात १२ कॉल रेकॉर्डचा उल्लेख आहे, ज्यातील एक फोन पीसीओ (PCO) वरून झाला होता. पवनराजे यांना आरोपींचा थेट फोन कधी गेलाच नाही, तर मग त्यांच्या पाठलागाची आणि संवादाची ही कथा न्यायालयाने ग्राह्य कशी धरायची? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

Operation Tiger Shivsena UBT : ‘ऑपरेशन टायगर’चा पहिला फोटो समोर! ठाकरे गटाचे ‘ते’ खासदार पंचतारांकित हॉटेलमध्ये

0

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ रंगणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे दिसत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात यश आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता यातील काही खासदारांचा एका पंचतारांकित हॉटेलमधील फोटो समोर आला आहे.

या फोटोत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) दिसत आहेत. तसेच या खासदारांसोबत शिवसेनेचे (शिंदे गट) राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मा हे देखील दिसून येत आहे. हा फोटो वर्मा यांच्या २२ फेब्रुवारीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि अभिषेक वर्मा यांच्याच अचूक रणनीतीमुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून या ऑपरेशनची रणनीती आखली जात होती आणि त्यासाठी गुप्त भेटीगाठीही सुरू होत्या. अखेर सोमवारी ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. तसेच हा फोटो नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, या एका फोटोने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मात्र जोरदार खळबळ उडवून दिली आहे.

Nashik News : सारडा सर्कल परिसरात महापालिकेने अनधिकृत हॉटेल्स आणि दुकानांवर चालवला बुलडोझर

0

नाशिक | Nashik

शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) आज (शनिवारी) धडक कारवाई केली. सारडा सर्कल आणि मुंबई नाका परिसराच्या (Mumbai Naka Area) जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अनधिकृत हॉटेल्स, टपऱ्या आणि पक्क्या दुकानांच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने थेट बुलडोझर चालवला.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील अनधिकृत व्यावसायिक बांधकांमांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त आणि अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. महापालिकेने संबंधित अनधिकृत हॉटेल चालक आणि दुकानदारांना (Shops) स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली.

आज सकाळीच मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक जेसीबी (JCB), बुलडोझर आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह सारडा सर्कल परिसरात दाखल झाले. बघता बघता रस्त्याकडेला असलेले अनधिकृत शेड, ओटे आणि हॉटेल्सचे अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्यात आले. कारवाई दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा

सारडा सर्कल हा अत्यंत गजबजलेला भाग असून, येथून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. अनधिकृत हॉटेल्स आणि त्यांच्याबाहेर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या.आज झालेल्या या धडक कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून वाहन धारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मनपाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

आज ‘देशदूत सहकार दीपस्तंभ पुरस्कार’सोहळा

0

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक‘देशदूत’तर्फे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी शनिवारी (दि.२०) ‘सहकार दीपस्तंभ पुरस्कार-२०२६’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले या मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत पार पडणार आहे. त्यांच्या हस्ते निवडक पतसंस्था आणि सहकारी बँकांना ‘सहकार दीपस्तंभ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल. शनिवारी सायंकाळी ५ वाजता नासिलब, नाशिक-पुणे रोड येथे हा सोहळा पार पडेल.

विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहणार्‍या ‘देशदूत’ने आपली सामाजिक बांधिलकी पुढे चालू ठेवत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातील संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले आर्थिक व सामाजिक कार्य समाजासमोर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संपादकीय : २० जून २०२६ – रस्त्यांवरील मृत्युतांडव थांबणार तरी कधी?

0

रस्त्यावरून प्रवास करून सुखरूप घरी परतणे हा आता नशिबाचा भाग व्हावा, इतकी भयानक परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. दिंडोरीमध्ये रस्त्यालगतच्या विहिरीत नऊ जणांच्या कुटुंबाचा बळी गेल्याची काळी घटना ताजी असतानाच, सोलापूरच्या तांदूळवाडीजवळ भाविकांची पिकअप गाडी रस्त्याकडेच्या उघड्या विहिरीत कोसळून आणखी आठ निष्पाप जीव जाणे, हा केवळ अपघात नसून प्रशासकीय यंत्रणेने केलेला खूनच म्हणावा लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आणि रस्ते सुरक्षा नियमांचे धिंडवडे निघत असताना शासन आणि प्रशासन मात्र ढिम्म आहे. एखादी भीषण दुर्घटना घडली की हळहळ व्यक्त करायची, उच्चस्तरीय चौकशीचे कोरडे बुडबुडे सोडायचे आणि मृतांच्या नातेवाईकांवर काही लाखांची सरकारी मदत फेकून हात झटकायचे, हा यंत्रणांचा निर्लज्जपणा जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे.

ग्रामीण आणि निमशहरी भागातील रस्त्यांची झालेली कमालीची दुरवस्था हे आजच्या ढिसाळ व्यवस्थेचे कटू सत्य आहे. रस्त्यांचे रुंदीकरण, खड्डेमुक्ती आणि डांबरीकरणाच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी कागदावर खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था जीवघेणीच राहते. माळशिरस येथील दुर्घटनेत रस्त्याच्या अगदी कडेला, पाण्याने काठोकाठ भरलेली मोठी विहीर कोणतीही संरक्षक भिंत, कठडा किंवा साधी जाळी नसताना मृत्यूचा जबडा वासून उघडी उभी होती. मुळात, मुख्य रस्त्याला लागून एवढा मोठा मृत्यूचा सापळा असताना तिथे साधा धोयाचा इशारा देणारा फलक किंवा रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेटर लावण्याचे साधे सौजन्यही सार्वजनिक बांधकाम विभागाला दाखवता आले नाही. विहिरीला कठडे नसणे हा केवळ जमीनमालकाचा दोष ठरवून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत यंत्रणा यांनी यापूर्वी अशा जीवघेण्या जागांचे सर्वेक्षण का केले नाही, याचे उत्तर आता जनतेला द्यावेच लागेल.

आपल्या देशात आणि राज्यात रस्त्यांची लांबी वाढवण्याच्या आणि गतिमान विकासाच्या पोकळ गप्पा जेवढ्या मोठ्या आवाजात मारल्या जातात, तेवढा भर रस्ते सुरक्षेच्या तांत्रिक बाबींवर कधीच दिला जात नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते अत्यंत अरूंद आहेत. त्यातच रस्त्यांच्या कडेला टाकलेली माती आणि खडी यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तीव्र वळणावर आवश्यक असणारे दिशादर्शक फलक गायब आहेत. याहून गंभीर बाब म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाची सेवा ग्रामीण भागात अत्यंत विस्कळीत आणि तोकडी आहे. वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव गरीब गावकर्‍यांना खासगी वाहनांचा, जीप किंवा पिकअप गाड्यांचा जीवघेणा प्रवास करावा लागतो. या खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबले जातात, ज्याकडे प्रादेशिक परिवहन विभाग आणि महामार्ग पोलीस यंत्रणा पूर्णपणे डोळेझाक करतात. ही वसुलीखोर यंत्रणा केवळ शहरांच्या नायांवर दंड गोळा करण्यात व्यस्त असते का, असा टोकदार प्रश्न आता उपस्थित होत आहे. या वाढत्या अपघातांची मालिका आणि निष्पापांचे बळी रोखण्यासाठी आता शासनाला वठणीवर आणणारे कालबद्ध पाऊल उचलण्याची गरज आहे.

केवळ कागदी नियम बनवून किंवा अपघात झाल्यानंतर तात्पुरती जाग येऊन यंत्रणा सुधारणार नाहीत. राज्यातील सर्वच महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांचे सुरक्षा ऑडिट तत्काळ युद्धपातळीवर केले गेले पाहिजे. रस्त्यालगत असलेल्या सर्व खासगी आणि सरकारी विहिरींना, खोल खड्ड्यांना किंवा ओढ्या-नाल्यांच्या कडेला मजबूत सिमेंटचे कठडे किंवा क्रॅश बॅरियर्स बसवणे कायद्याने सक्तीचे केले पाहिजे. जे जमीनमालक आपल्या विहिरीला संरक्षक भिंत बांधणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. परंतु त्याहूनही मोठी जबाबदारी निकृष्ट दर्जाचे रस्ते मंजूर करणार्‍या शासकीय अभियंत्यांवर आणि ठेकेदारांवर निश्चित झाली पाहिजे.

शेवटी, रस्ते सुरक्षा ही केवळ कागदावर किंवा भाषणापुरती मर्यादित राहता कामा नये. वाहन चालकांनीही ओव्हरलोडिंग टाळून मर्यादित वेगाचे पालन करणे गरजेचे असले, तरी मुख्य दोष हा यंत्रणेच्या ढिसाळपणाचाच आहे. रस्त्यालगतचे हे मृत्यूचे सापळे जर सरकार तत्काळ बंद करू शकत नसेल, तर डिजिटल इंडियाचे ढोल वाजवणे निव्वळ ढोंगीपणाचे ठरेल. सरकारने पोकळ आश्वासनांचे मलम लावणे थांबवावे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी दूर करून, रस्ते सुरक्षेसाठी ठोस आणि आक्रमक पावले उचलावीत, हीच या भीषण अपघातात बळी गेलेल्या निष्पाप आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Ahilyanagar : यंदा वारीमध्ये पाण्याचा वापर जपून करा

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आषाढी वारीत सहभागी दिंडी व वारकर्‍यांच्या नियोजनासाठी, त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रत्येक दिंडीने त्यांच्यासोबत निघालेल्या वारकर्‍यांची संख्या, मुक्कामाच्या ठिकाणीची माहिती नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 25 जूनपूर्वी करावी, म्हणजे नियोजन करणे सोपं जाईल, असे आवाहन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तसेच यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता वारीतील प्रवासादरम्यान वारकर्‍यांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, मानाच्या पालख्यांचे प्रमुख, विविध दिंडी प्रमुख तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणांहून अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यामार्गे पंढरपूरकडे जातात. श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणार्‍या दिंड्या आणि पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. वारी मार्गावरील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून ते खड्डेमुक्त करावेत. दिंडी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थापन चोखपणे करण्यात यावे. मुक्कामस्थळी चोरी, गैरप्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दिंडी मार्गावरील सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा.

मुक्कामाच्या ठिकाणी वारकर्‍यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण तसेच अखंडित वीजपुरवठा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. सोलापूर जिल्ह्यांतही वारकर्‍यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी व प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असेही ते म्हणाले. बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी आपल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, पालखी प्रमुख आणि दिंडी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीला जिल्ह्यातील मानाची दिंडी असणार्‍या नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी नेवासा, शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज पालखी पैठण, संत निळोबाराया पालखी (पारनेर) आणि विश्वगुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबकेश्वर यांचे प्रतिनिधींसह अन्य लहानमोठ्या दिंड्यांचे प्रतिनिधी हजर होते.

दिंड्या नियोजनासाठी अधिकार्‍यांची संपर्कसूची
दिंडी मार्गावर आवश्यक वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांमध्ये वारकर्यांच्या मोफत उपचाराची सोय करावी. वारकर्‍यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक उपचार तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक दिंडीसाठी संपर्क अधिकार्‍यांची नेमणूक करण्याबरोबरच दिंड्यांच्या मुक्कामाचे नियोजन व संबंधित अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक असलेली संपर्कसूची तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रस्ते, पाणी, मंडप आणि आरोग्य सुविधा द्या
जिल्ह्यातून जाणार्‍या चार मानाच्या दिंड्यासह अन्य शेकडो दिंड्या मार्गस्थ होतात. या दिंड्या मार्गाची दुरूस्ती, दिंड्यांना पाणी, फिरते शौचालय, फिरते स्नानगृह, मंडळ, स्वयंपाकासाठी गॅस, मुक्कामासाठी शाळांच्या इमारती अथवा वॉटरफु्रप मंडप, दिंडी मार्गावर औषध उपचारांसह प्रत्येक ठिकाणी दिंडीचे शासकीय स्वागत व्हावे, अशी अपेक्षा बैठकीला उपस्थितीत दिंड्याच्या प्रतिनिधींनी केली.

दिंड्यांसाठी 3 कोटी 86 लाखांचा निधी
जिल्ह्यातील दिंड्यांच्या नियोजनासाठी यंदा 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मागील वर्षी हा निधी 2 कोटी 64 लाख रुपये होता. यंदा दिंड्यासाठी 1 कोटींहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आलेला असून पंढरपूरमध्ये मोठ्या दिंड्याच्या मुक्कामाची व्यवस्था असते. केवळ लहान दिंड्याचा प्रश्न असून त्यासाठी सोलापूरचे मंत्री विजयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक घेवून नियोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

आज ‘सार्वमत शिलेदार’ सन्मान सोहळा

0

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नगर जिल्ह्याचे मुखपत्र दैनिक सार्वमत आयोजित ‘सार्वमत शिलेदार’ सन्मान सोहळा शनिवार, 20 जून रोजी सायंकाळी 5 वाजता संगमनेरमधील वसंत लॉन्स् येथे रंगणार आहे. ग्रामीण विकासात आपल्या कौशल्यपूर्ण नेतृत्वातून योगदान देणार्‍यांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान होणार असून सार्वमत-देशदूत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, आ. सत्यजित तांबे, आ. अमोल खताळ प्रमुख पाहुणे आहेत.

सुवर्ण महोत्सवी वाटचालीत सार्वमतने भूमिपुत्रांचे दैनिक म्हणून आपली ओळख दृढ केली. जिल्ह्यातील शेती, सिंचन, सहकार यासह कृषी विकासाच्या प्रत्येक चळवळीत ‘सार्वमत’ सक्रीय राहिला. जिल्ह्यात अनेकजण आपल्या कार्यक्षेत्रातून विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांचे कार्य येथील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी दिशा देणार आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक यासह विविध संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व विद्यमान पिढी भविष्यासाठी सज्ज होत आहे. त्यांच्या गौरव सोहळा संगमनेर येथे होत आहे.