Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 48

Crime News : नातेवाईकांकडूनच अनधिकृत प्रवेश करून वस्तुंची चोरी; शिक्षिकेच्या घरी घरफोडी

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एका शिक्षिकेच्या घरी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नातेवाईकांनी घरफोडी करून संसारोपयोगी साहित्यासह 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून 16 एप्रिल रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंदाकिनी सदाशिव लाटे (वय 52, हल्ली रा. वडाळी, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वडाळी येथे नोकरीस असून त्या आठवड्याच्या सुट्ट्यांमध्ये अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रौनक अपार्टमेंट, प्लॉट नं. 10 येथे वास्तव्यास येतात.

सदर फ्लॅट त्यांच्या नावावर असून त्यांनी तो 2008 साली खरेदी केला आहे. 15 एप्रिल रोजी त्यांचा मुलगा प्रतिक औटी फ्लॅटवर गेला असता, फ्लॅटचे कुलूप तोडलेले असून घरातील सामान चोरीस गेले आहे, असे त्याच्या लक्ष्यात आले व त्याने फिर्यादीला माहिती दिली. त्यांनी तातडीने फ्लॅटवर धाव घेतली असता त्यांना घरातील वस्तू दिसून आल्या नाही. स्थानिकांकडून माहिती घेतली असता 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी यांचे नातेवाईक सोपान रामनाथ कासार (रा. ऐश्वर्या बंगला, तिडके कॉलनी, बाजीरावनगर, नाशिक) हे टेम्पोसह काही तरुणांसोबत आले होते.

त्यांनीच फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील वस्तू उचलून नेल्याचे वॉचमनने सांगितले. घरातील वस्तूमध्ये सोफा, वॉल फॅन, गिझर, इन्व्हर्टर, घरगुती भांडी व इतर वस्तूंचा समावेश आहे. यासंदर्भात मंदाकिनी लाटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोपान रामनाथ कासार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shrigonda : संत शेख महंमद महाराज मंदिरासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार

0

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

वारकरी संप्रदाय जातीयता मानत नाही. श्रीगोंद्यात संत शेख महंमद यांचा परंपरेने उत्सव साजरा केला जातो. संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा आड येणार्‍या आमीन शेख नावाचा मीठाचा खडा बाजूला काढून टाकावा लागेल. संत शेख महंमद यांचे मंदिर हे वारकर्‍यासाठी इतिहास आणि अस्मितेचा प्रश्न आहे. मंदिराचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी श्रीगोंदा येथे केले.
श्रीगोंदा शहरातील संत शेख महमंद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावकर्‍यांनी, वारकर्‍यांनी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद पाळून तहसील कार्यलयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले आहे. यावेळी हभप बंडातात्या कराडकर म्हणाले, संत परंपरेतून संत शेख महंमद यांना बाजूला जाऊ देणार नाही.

संत शेख महंमद यांचे आध्यात्मिक साहित्य ज्यांना मान्य नाही. तो त्यांचा वंशज कसा असेल. मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलतो. सरकारने गावकर्‍यांना बेमुदत धरणे धरण्याचा वेळ आणू नये. लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी आमीन शेख यांना संत कळले नाहीत. त्यांना त्याचे वाड्मय माहिती नाही. शेख महंमद यांच्या समाधीला कान लावा. तुम्हाला आत्म साक्षात्कार होईल. मंदिराचे आता काम थांबणार नाही. हा विषय संपूर्ण वारकर्‍यांचा आहे. संत शेख महंमद यांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी केली, असे सांगितले. खा. निलेश लंके यांनी समजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने दर्गाह ट्रस्ट तातडीने रद्द करावे, समाजाची भावना महत्वाची असल्याचे सांगितले. माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी मंदिराच्या विषयात समोरची माणसे त्या पात्रतेची नाहीत. केवळ चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री यांची वेळ घेतली आहे. मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला.

आमदार विक्रम पाचपुते यांनी मंदिरासाठी संयम महत्वाचा आहे. आंदोलन हे ठिय्या आंदोलन आहे. शासन दरबारात प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर तो कायदा बदलण्याचे काम जनभावना करत असते. संयमाने पुढे जायचे आहे. ज्या सूचना येतील त्या मान्य आहे. आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे. घनश्याम शेलार यांनी आमीन शेख यांनी देवस्थान मठाचे नाव बदलले रेकॉर्डवर सुफी संत हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट असे नाव बदलले आहे ते गावाला मान्य नाही, असे स्पष्ट केले. यावेळी राजेंद्र नागवडे यांनी शेख याने हेकेखोरपणा सोडावा.गावाला निर्णय घेण्याचे वेळ आली आहे. तो नाटक करतो, पण कृती करत नाही, असे सांगितले. यावेळी बाबासाहेब भोस, नाना कोथंबीरे, टिळक भोस, अरविंद कापसे, रंगनाथ बिबे, बाळासाहेब नाहटा, बाळासाहेब महाडिक, रामचंद्र महाराज दरेकर, प्रणोती जगताप, मनोहर पोटे आदींची भाषणे झाली.

NMC : मनपाकडून लवकरच पाच नवीन ई-चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होणार

0

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक मनपाच्या वतीने येत्या काही दिवसांत शहरात पाच ठिकाणी नवीन ई-चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या या ई-स्टेशनचे प्रति युनिट दर खासगी चार्जिंग स्टेशनपेक्षा दहा ते तेरा रुपयांनी कमी राहणार आहे.

नाशिक शहरात तीन खासगी चार्जिंग स्टेशन आहेत. त्याचे दर 21 ते 29 रुपये प्रति युनिट असल्याचे मनपाने म्हटले आहे. त्या तुलनेत महापालिकेच्या ई-चार्जिंग स्टेशनवरील दर कमी आहे. मनपा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन एक ते दीड आठवडयात कार्यन्वित होणार आहेत.

वाहन चार्जिंगसाठी साडेसोळा रुपये प्रति युनिट दर ठरवल्याने ई-वाहन वापरणार्‍यांची गर्दी होणार आहे. सध्या राजीव गांधी भवन येथे टेस्टींग म्हणून वाहनांना चार्ज केले जात असून तेथे वाहनधारकांची गर्दी होत आहे.

एक ते दीड वर्षापासून चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचे प्रयत्न मनपाच्या यांत्रिकी विभागाकडून सुरु होते. नाशिक शहरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) योजनेअंतर्गत दहा कोटींच्या निधीतून शहरात वीस चार्जिंग स्टेशन उभारत आहे. पहिल्या टप्यात शहरातील वीस ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही सोय असेल.

ट्रक-टँकर अपघातात दोघांचा मृत्यू

0

वावी । वार्ताहर vavi

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका संपायचे नाव घेत नसून मलढोण शिवारात चैनल नंबर 545 वर बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास झालेल्या मालवाहू ट्रकला पेट्रोल वाहतूक करणार्‍या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांंचे चालक जागीच ठार झाले.

समृद्धी महामार्गावर मलढोण शिवारात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताची माहिती समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रण कक्षाचे अधिकारी मिलिंद सरवदे यांना मिळताच त्यांनी शिर्डी, सिन्नर, गोंदे येथील वाहतूक नियंत्रण कक्ष व वावी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. .

छत्रपती संभाजी नगर येथून बियरच्या बाटल्यांनी भरलेला मालट्रकचे टायर पंचर झाल्याने चालकाने मळढोण शिवारात रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 20/– 2932 उभा केला व पंक्चर काढण्याचे काम चालू असतानाच भरधाव वेगात नागपूरहून मुंबईकडे जाणार्‍या जिओ कंपनीच्या रिकाम्या पेट्रोल टँकर क्र. एम. एच. 29/ — 2519 ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये दोनही ट्रक व टँकर चालक ठार झाले.

ट्रक चालकाचे नाव समजू शकले नाहीतर मयत टँकर चालकाचे नाव विजेंद्र मनी तिवारी आहे. शिर्डी येथील वाहतूक शाखेच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दोनही वाहनांच्या नंबरवरुन दोनही चालकांच्या नातेवाईकांसह मालकांशी वावी पोलीस संपर्क करत आहे.

नासिक उत्पादन शुल्क विभागाला बिअर भरुन आलेल्या ट्रकबाबत वावी पोलीसांनी माहिती दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोठावळे, हवालदार लगड करीत आहेत.

Onion Rate : वांबोरीतील कांदा व गव्हाचे वाचा भाव

0

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

आज गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 1 हजार 209 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपये, दोन नंबरचा कांदा 605 रुपये ते 1000 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 600 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 16 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 400 रुपये भाव मिळाला.

भुसार मालात गहु (Wheat) 2 हजार 200 रुपये ते 2 हजार 700 रुपये, तुर 6000 रुपये ते 6 हजार 900 रुपये, हरभरा (Gram) 5 हजार 376 रुपये ते 5 हजार 496 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 100 रुपये ते 4 हजार 200 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

महेश मांजरेकर यांना ‘व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

0

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा चित्रपती ‘व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ नामवंत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. तर यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकी १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या २५ एप्रिल रोजी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे एका भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली.

त्यानुसार हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे १० लाख आणि ६ लाख रुपये, स्मृतिचिन्ह तसेच मानपत्र, चांदीचे पदक असे आहे.

चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून सहा लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार्थीची निवड करण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर समिती नेमण्यात आली होती. या समितीत पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र आदींचा समावेश होता.

२० एप्रिलला संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम
दरम्यान, या सोहळ्याशिवाय संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश आणि नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी यावेळी दिली.

Maharashtra News : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांच्या बदलीला अखेर स्थगिती

0
Maharashtra News : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांच्या बदलीला अखेर स्थगिती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची (Malegaon Bomb Blast Case) सुनावणी (Hearing) करणारे विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या बदलीला उच्च न्यायालयाने (High Court) तात्पुरती स्थागिती दिली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला अंतिम टप्प्यात आला असतानाच लाहोटी यांच्या बदलीचा आदेश निघाला होता. त्यावर बॉम्बस्फोट पिडीतांनी आक्षेप घेल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाने लाहोटी यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.

मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष एनआयए न्यायालयात (NIA Court) मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. या कालावधीत बॉम्बस्फोटाची सुनावणी करणारे न्यायाधीश वेळोवेळी बदलले. न्यायाधीश लाहोटी हे या प्रकरणातील पाचवे न्यायाधीश आहेत. त्यांनी सुनावणीला गती देऊन खटला अंतिम टप्प्यात आणली. याचदरम्यान उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने त्यांची नाशिक येथे बदली करण्याचा आदेश जारी केला.

उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून रोजी न्यायालये पुन्हा सुरू झाल्यानंतर तो बदलीचा आदेश लागू होणार होता. मात्र त्याआधीच बॉम्बस्फोटपीडित कुटुंबीयांतर्फे शाहिद नदीम यांनी लाहोटी यांच्या बदलीच्या आदेशावर आक्षेप घेतला होता. न्यायाधीशांच्या बदलीमुळे न्यायदानावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांतच गुरुवारी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी लाहोटी यांच्या बदलीचा आदेश स्थगित (Stayed) केला असून त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.

Nashik Crime : ट्रक चाेरीचा बनाव; चालकाने परस्पर विल्हेवाट लावून केली विक्री, तिघे ताब्यात

0
Nashik Crime : ट्रक चाेरीचा बनाव; चालकाने परस्पर विल्हेवाट लावून केली विक्री, तिघे ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भंगाराच्या मालाने भरलेला ट्रक चोरी (Truck Theft) झाल्याचा बनाव करत त्याची परस्पर विल्हेवाट लावून भंगार विक्री केल्याची घटना गुन्हे शाखा युनिट एकच्या (Unit One) पथकाने उघडकीस आणली आहे. ट्रकमालकाच्या संगनमताने ट्रकचालकाने हा गुन्हा दाखल केल्याचे उघडकीस आले आहे. संशयित दोघांसह ट्रकचालक साेनू उर्फ फरहान यास मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) ताब्यात देण्यात आले आहे.

वडाळानाका येथील सर्व्हिस रोड भागातून ३ एप्रिलला रात्री १०.३० वाजता ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल आहे. चोरीस गेलेल्या ट्रकमध्ये १२ लाख रुपयांचे भंगार साहित्य होते. तपास करताना युनिट एकचे श्रेणी उपनिरीक्षक रवींद्र बागुल व हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमालकानेच चालकासोबत संगनमत करून चोरीचा बनाव केल्याचे समजले. त्यासाठी इतरांनी मदत केली. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन संशयित राजस्थान येथून मालेगावच्या (Malegaon) दिशेने येत असल्याची माहिती पथकास कळाली.

त्यानुसार युनिट एकचे प्रभारी मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. हवालदार काठे, प्रशांत मरकड, प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, नाझीमखान पठाण, नाईक विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी व अमोल कोष्टी यांनी धुळे जवळील लळिंग टोलनाका (Toll Booth) येथून खासगी बसमधून ताब्यात घेतले. त्यात सालीम रशीद शेख (१८, रा. द्वारका) व नाविद आरीफ शेख (२१, रा. साठेनगर, वडाळा) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता ट्रकमालक साहिल हनिफ शेख (२७, कथडा) याच्या सांगण्यावरून ट्रक चोरीचा बनाव करीत भंगार साहित्य विक्री केल्याची कबुली दिली.

दरम्यान, ट्रकचालक सोनु उर्फ फरहान याच्या मदतीने संशयितांनी ट्रक स्क्रॅप केला. त्यानंतर ट्रकच्या स्क्रॅपसह ट्रकमधील भंगार माल जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीत (Company) विक्री केला. त्यामोबदल्यात मिळालेल्या ७ लाख रुपयांपैकी ३ लाख रुपये सालीम शेख यास मिळाले. गुन्हे शाखेच्या पथकाने ते पैसे जप्त केले आहेत. 

Nashik Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५६ लाख उकळले

0
Nashik Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५६ लाख उकळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

व्हॉट्सअपवर लिंक (WhatsApp Link) पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करण्यास प्रोत्साहित करीत भामट्यांनी शहरातील गुंतवणूकदारांना ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्यासह इतर गुंतवणूकदारांना चोरट्यांनी २० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान, गंडा घातला. गुंतवणूकदारांसोबत व्हॉट्सअपवरून संपर्क साधला. त्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करून गुंतवणूकीची माहिती दिली. त्यानंतर भामट्यांनी गुंतवणूकदारांना लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. शेअर, आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने संशयितांनी गुंतवणूकदारांकडून ५६ लख रुपये घेतले. मात्र हे पैसे शेअर मार्केटमध्ये (Stock Market) न गुंतवता भामट्यांनी घेतले.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी (Police) तपास करुन केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपास करीत ९ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम गोठवली आहे. तसेच सायबर पोलिस ठाण्यात ज्यांनी गुंतवणूकदारांसोबत संपर्क साधून गंडवले त्यांच्यासह ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Raj Thackeray on Hindi Language : “… तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ”; हिंदी भाषा सक्तीवरून राज ठाकरेंचा गर्भित इशारा

0

मुंबई | Mumbai

तमिळनाडू सरकारने केंद्राच्या त्रिभाषा सूत्राला जोरदार विरोध दर्शवला असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे सन २०२५-२६ पासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही (Hindi Language) सक्तीची करण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असणार आहे. मात्र, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे.

त्यांनी यासंदर्भात एक्सवर (ट्विट) पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये “आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर (Maharashtra) हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे”, असा इशाराच (Warning) राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.

केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.

प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.

बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.

प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.

माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.

आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !

आपला नम्र

राज ठाकरे ।