Wednesday, May 7, 2025
Home Blog Page 53

Karjat : नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राज्य सरकारने नवीन कायदा केल्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे बुधवारी (दि.16) 13 नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या (दि.15) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यामध्ये एखाद्या नगराध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर दहा दिवसात सर्वसाधारण सभा बोलून मतदान घेण्याचे बंधनही जिल्हाधिकार्‍यांवर घालण्यात आले आहे.

राज्यातील सर्वच नगरपंचायती नगरपरिषदा यासाठी सन 2020 साली राज्य सरकारने अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी नवीन कायदा अमलात आणला होता. या कायद्यामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांना व सरकारला अधिकार प्राप्त होते. दरम्यान, कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पक्षांची सत्ता होती. 17 पैकी तब्बल 15 सदस्य या दोन पक्षांचे होते आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे बारा सदस्य होते. यामुळे नगरपंचायतमध्ये रोहित पवार यांची तशी एकहाती सत्ता होती. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या भारतीय जनता पक्षाचे नगरपंचायतमध्ये अवघे दोन सदस्य आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवकांमध्ये फूट पडली. पक्षाचे आठ काँग्रेस पक्षाचे तीन व भाजपचे दोन सदस्य असे एकूण 13 जणांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. मात्र, प्रस्ताव दाखल केल्यानंतर यामध्ये किमान तीन महिन्यांचा कालावधी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जाणार आहे हे लक्षात आल्यानंतर राज्यामध्ये महायुतीची असणारी सत्ता आणि वर्चस्व याचा पुरेपूर वापर करत कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये थेट कायद्यामध्येच बदल करण्यात आला.

एवढेच नव्हे तर मंगळवारीच राज्यपालांची देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर स्वाक्षरी देखील घेण्यात आली. अशा पद्धतीने अतिशय वेगाने या सर्व घडामोडी घडल्या आहेत. आणि यासाठी मोठी राजकीय शक्ती सरकारमध्ये असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. नवीन कायद्याने नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सदस्यांना देण्यात आला आहे. नवीन कायद्यामुळे नगराध्यक्ष उषा राऊत यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी कमी कालावधीमध्ये आता प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सक्रीय सहभाग असल्याची चर्चा आहे.

नवीन कायदा केल्यामुळे बुधवारी जिल्हाधिकार्‍यांकडे नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावेळी रोहिणी सचिन घुले, छाया सुनील शेलार, संतोष सोपान मेहेत्रे, ज्योती लालासाहेब शेळके, सतीश उद्धवराव पाटील, लंकाबाई देविदास खरात, भास्कर बाबासाहेब भैलूमे, भाऊसाहेब सुधाकर तोरडमल, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहिनी दत्तात्रय पिसाळ, अश्विनी सोमनाथ गायकवाड व सुवर्णा रवींद्र सुपेकर या तेरा नगरसेवकांनी पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. आता या नवीन अविश्वास प्रस्तावावर पुढील निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कोणत्या तारखेला बैठक बोलावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जुनी प्रक्रिया रद्द
यामुळे यापूर्वी जो अविश्वास प्रस्ताव हुशार राऊत यांच्यावर दाखल केला होता ती सर्व प्रक्रिया आता आपोआपच रद्द झाली आहे. त्यामुळे मागील अविश्वास प्रस्तावावर येत्या 22 तारखेला होणारी सुनावणीही रद्द झाली आहे. आता नवीन अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकारी कोणती तारीख देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

0

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

यावर्षीच्या मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार तर संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 एप्रिलला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनिस यांना साहित्य क्षेत्राचा तर ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला नाट्य श्रेत्रातील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम या सामाजिक संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. अभिनेते सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर ,वायोलिनिस्ट एन.राजम गायिका रीवा राठोड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.दीनानाथ मंगेशकर जयंती म्हणजेच 24 एप्रिल रोजी पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरानजीक असलेल्या ताहाराबाद रोडवरील सुकड नाल्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विरगाव येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर पाठीमागील युवक जखमी झाला.

दुचाकी (क्र. एम. एच. 41 बी. ए. 2426) वरून यशवंत ऊर्फ नाना भरत ठाकूर (27) हा विरगावकडून सटाण्याच्या दिशेने येत असताना रात्री अज्ञात वाहनाने धडक दिली. यशवंत नाना ठाकूर यास डोक्यास व चेहर्‍यावर जोराचा मार लागल्यामुळे त्याला तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

वैद्यकीय तपासणी करत असताना डॉक्टरांनी ठाकूर यास मृत घोषित केले तर जोडीदार भरत सुमा निकम गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास सटाणा ग्रामीण रुग्णालयातून मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती सटाणा येथील गौरव प्रकाश चव्हाण यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती कळताच विरगावावर शोककळा पसरली आहे.

राज्यात पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची

0

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

तमिळनाडू सरकारने केंद्राच्या त्रिभाषा सूत्राला जोरदार विरोध दर्शवला असताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे सन २०२५-२६ पासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.

नवीन धोरणानुसार पारंपरिक १० : २ : ३ रचनेऐवजी आता ५ : ३ : ३ : ४ असा शैक्षणिक आकृतीबंध असणार आहे. त्यामुळे यापुढे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत.

पायाभूत स्तर : वय ३ ते ८ वर्ष – बालवाटिका – १, २, ३, तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी
पूर्वतयारी स्तर : वय ८ ते ११ वर्ष – इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी
पूर्व माध्यमिक स्तर : वय ११ ते १४ – इयत्ता सहावी, सातवी आणि आठवी
माध्यमिक स्तर : वय १४ ते १८ – इयत्ता नववी ते बारावी

अशी होणार अंमलबजावणी
२०२५-२६ – इयत्ता १
२०२६-२७ – इयत्ता २, ३, ४ आणि ६
२०२७-२८ – इयत्ता ५, ७, ९ आणि ११
२०२८-२९ – इयत्ता ८, १० आणि १२

तर बालवाटिका १, २, आणि ३ राबविण्याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाच्या सहमतीने स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार एनसीईआरटीद्वारे तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचा राज्य स्तरावर आवश्यक बदलांसह उपयोग केला जाणार असून यात बालभारती तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आज प्रशिक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

या धोरणानुसार पायाभूत साक्षरता, अनुभवाधिष्ठित शिक्षण, मूल्याधारित अभ्यासक्रम, समग्र मूल्यांकन आणि शिक्षक प्रशिक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे.राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने या अभ्यासक्रम आराखड्यांना मान्यता दिली असून या निर्णयामुळे महाराष्ट्रात शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहेत.

तलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू

0

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील पिंपळशेवडी जवळील कजवाडेलगत असलेल्या पाझर तलावात खेळताना तोल जाऊन पडल्याने क्रंकाळे गावातील आठ वर्षीय बालकासह सहा वर्षीय बालिकेचा पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील कंक्राळे येथील सुनील बुधा पवार (8) या बालकासमवेत त्याच्या घराशेजारी राहणारी सहा वर्षीय मुलगी रोहिणी निकम व गावातील चार ते पाच मुले गावाजवळील पाझर तलावात खेळत खेळत पाण्याजवळ पोहोचले.

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुनील पवार व त्याच्या शेजारी राहणारी मुलगी रोहिणी हे दोघे तलावातील पाण्यात तोल जाऊन पडल्याने पाण्यात बुडाले. दोघेजण तलावात बुडाल्याचा हा प्रकार अन्य लहान मुलांनी पाहताच त्यांनी घाबरून तेथून पळ काढला व घडलेली घटना गावात येऊन नागरिकांना सांगितली.

नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाण्यात बुडालेल्या सुनील पवार व बालिका या दोघांचे मृतदेह पाण्यातून काढले. या पाझर तलावात 10 ते 15 फूट पाणी आहे. मुख्य चारीत दोघेजण बुडाले होते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळशेवडी गावाजवळील कजवाडे येथे घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी शोकाकूल वातावरणात दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेची माहिती पोलीस पाटील एकनाथ दासनारे यांनी पोलिसांना देताच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंमत चव्हाण करत आहेत.

Ahilyanagar : कालव्यात दोन बहिणींसह ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू

0

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील ताजू (Taju) गावाच्या शिवारामध्ये घोड कालव्यात (Ghod Canal) पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचवण्यासाठी गेलेला ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Water Drowning Death) झाला आहे. दिपाली वणेश साबळे (वय 14), ऐश्वर्या वणेश साबळे (वय 10), कृष्णा रामदास पवळ (वय 26) अशी मयतांची नावे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घोड कालव्याचे आवर्तन सध्या सुरू आहे.

याच कालव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी (Swimming) दिपाली साबळे व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले गेली असता कालव्यातील पाण्याचा वेग जास्त असल्याचा अंदाज न आल्याने हे चारही मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी शेजारी शेतात काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ यांना या मुलांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ कालव्याकडे धाव घेतली.

त्यांनी कुठलाही विचार न करता पाण्यामध्ये उडी मारून दोन मुलांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र दोन मुलींना वाचवण्यासाठी (Girls Save) पुन्हा उडी मारली असता त्याचाही पाण्यामध्ये बुडवून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या तिघांचे मृतदेह कर्जत (Karjat) येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू – मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

0
Maharashtra News : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू - मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

डिजिटल शिक्षणाच्या (Digital Eduation) दिशेने महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil ) यांनी बुधवारी येथे दिली.

‘महाज्ञानदीप’  या पोर्टलचा (Mahagyandeep Portal) शुभारंभ आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक’ हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते.

Nashik News : जिल्हा बँकेतील ‘ठेवीं’ना मुहूर्त लागेना

0
#image_title

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेतकऱ्यांच्या (Farmer) जिव्हाळ्याच्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला (Nashik District Bank) आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने पाच लाखाची ठेव ठेवण्याचे आवाहन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केले. मात्र, त्याला मुहुर्त अद्याप लागलेला नाही. त्यातच तीन महिने स्थगिती दिल्यामुळे कर्जवसुलीला ब्रेक लागला आहे.

जिल्हा बँकेचे एकूण २,१०० कोटी रुपयांचे कर्ज (Loan) थकीत आहे. बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे सक्तीची कर्जवसुली केली जात होती. जिल्ह्यातील ४० हजार कर्जदारांना सहकार कायद्याच्या कलम १०१ अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यापैकी १,१०० कर्जदारांच्या मालमत्तेवर बँकेचे नाव लागले होते. बँकेच्या या प्रक्रियेस शेतकरी संघटनांनी विरोध केला. बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून गेल्या आठवड्यात बैठक झाली. मात्र, त्यात बँकेच्या सक्तीच्या कायदेशीर कर्जवसुलीस पुढील तीन महिने स्थगिती देण्याचा निर्णय कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतला. तसेच बँकेचे व्यवहार सुरू व्हावेत, याकरीता जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांकडून प्रत्येकी पाच लाखांचे ‘मुदत ठेवी’ (Deposits) बँकेत ठेवून जिल्हा बँकेला ऊर्जितावस्था मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यानंतर वसुली थांबल्याने थकीत कर्जदार निर्धास्त झाले. बँक कर्मचारीही निश्चिंत झाले. कारण रोज वसुलीचा आकडा द्यावा लागत होता. कर्जदारांच्या मागे तगादा लावावा लागत होता. आता तीन महिने वसुलीच नसल्याने कारभाराला मरगळ येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता मंत्र्यांनी शासनाकडील सव्वासहाशे कोटी रुपये मिळवून दिले. तसेच, लोकप्रतिनिधींच्या ठेवी दिल्या तरच बँक तग धरणार आहे. अन्यथा ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था होईल. वसुली थांबवण्याच्या निर्णयाने कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यांनीच लावला हातभार

बँकेच्या नाशिक येथील जिल्हा परिषद शाखेचे शिपाई मिलिंद रक्ते यांनी ८ लाख २५ हजार रुपये ठेवले, गोरख जाधव या विभागीय अधिकाऱ्याने मालेगाव तालुक्यातून ५ कोटीच्या नवीन ठेवी गोळा केल्या. शाखा व्यवस्थापक (जायखेडा) एन. एस. नंदन यांनी वैयक्तिक ६ लाखांची नवीन ठेव जमा केली. बँक निरीक्षक एम. जे. शेलार यांनी वैयक्तिक रु. ५ लाख नवीन ठेवी जमा केली.

Uddhav Thackeray : निर्धार मेळावा होऊ नये म्हणून दंगल घडवली – उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

0

नाशिक | Nashik

शहरातील मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. तर शिबिराचा समारोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणाने झाला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये निर्धार मेळावा होऊ नये म्हणून दंगल घडवली असे म्हणत विविध विषयांवरून महायुतीवर चांगलाच हल्लाबोल केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेबांनी माझ्यामागे तुमच्या सारखी पुण्याई उभी केली याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आपण असून, महाराष्ट्रात दिशा आपण ठरवू कुणी गद्दार ठरवू शकत नाही. महाराष्ट्रात कुणाची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. आमची मुंबई लुटली जात असून गुजरातला सगळं नेलं जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने आम्हालाही वाटलं होतं की स्मारक होईल. मात्र, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे शिवरायांचे भव्य स्मारक राज्यपाल भावनाच्या जागेवर उभे करा. शिवाजी महाराजांपेक्षा मोठे कोणीच असू शकत नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. चार दिवसांपूर्वी अमित शहा रायगडवर आले आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की,’शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेऊ नका.पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सूरत लुटली त्यावेळी त्याची बातमी ही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे अमित शाहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये. भाजपला शिवाजी महाराजांबद्दल एवढंच वाटत असेल तर त्यांनी शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी”, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

तसेच “शिवसेनेने हिंदुत्व सोडलं अशी बोंब मारणाऱ्या भाजपला सांगतो की, मी तुम्हाला सोडले हिंदुत्व सोडलेले नाही. शिवसेना नसती तर तुम्ही आयोध्येपर्यंत पोहोचू शकले नसते. भाजपने बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’च्या माध्यमातून ३२ लाख मुस्लिमांना भेटीचे वाटप केले. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेले होते? म्हणजे महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आणि बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे असे यांचे धोरण आहे. मी मुख्यमंत्री असताना कसलाही भेदभाव केला नाही. मी केलेल्या कामांमुळे मुस्लिम लोक माझ्यासोबत आले आणि हे घाबरले”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दलित सर संघचालक करून दाखवावा

आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले. त्यांची एकूण वाटचाल पाहिली तर खूप खोलात जातील. मोदी म्हणतात की, काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष करुन दाखवावा. पण मला एक-दोन गोष्टी आवडल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संघाने एक दलित समाजाच्या नेत्याला संरसंघचालक करुन दाखवावा. लावा ना, शर्यत. येत्या वर्षात संघाला १०० वर्ष होत आहेत. काँग्रेसचे सव्वाशे वर्ष होत आहेत. संघाचे आतापर्यंतचे सरसंघचालक आणि काँग्रेसचे प्रमुख यांची यादी काढा. कोण दलित होतं आणि कोण मुसलमान होतं के काढा आणि लोकांसमोर ठेवा. पण लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

नाशिकच्या विविध मुद्द्यांवरून सरकारला विचारला जाब

यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सरकारला विविध प्रश्नांवरून जाब विचारला. ते म्हणाले की, “नाशिकच्या पालकमंत्री पदाचा काय झालं? स्मार्ट सिटीचं काय झालं? शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झालं? कोकाटे शेतकऱ्यांबद्दल कोकलत आहेत”, असेही ठाकरे यांनी म्हटले.

Chief Justice Of India : भारताच्या सरन्यायाधीशपदासाठी संजीव खन्ना यांनी केली भूषण गवई यांच्या नावाची शिफारस

0
Chief Justice Of India : भारताच्या सरन्यायाधीशपदासाठी संजीव खन्ना यांनी केली भूषण गवई यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली | New Delhi

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) हे १३ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर आता त्यांच्याजागी सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील (Maharashtra) पुत्र भूषण गवई विराजमान होणार आहेत. गवई हे १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) संजीव खन्ना यांनी आज (बुधवारी) केंद्रीय कायदा मंत्रालयाला भूषण गवई यांना सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली.

धनंजय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता भूषण गवई (Bhushan Gavai) हे सरन्यायाधीश होणार असून, ते देशाचे ५२ वे सरन्यायाधीश असतील. जवळपास सहा महिने गवई या पदावर असणार आहेत. गवई हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असणार आहे. याआधी न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन पहिले दलित मुख्य न्यायाधीश बनले होते.

दरम्यान, भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात (Amravati District) २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायमूर्ती दिवंगत बारिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. गवई हे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते. यानंतर आता ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत.