अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पारनेर व नगर तालुक्याच्या परिसरात दहशत निर्माण करून शरीराविरुद्ध तसेच मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या तिघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून सराईत व गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या टोळीतील प्रमुख अतुल विश्वनाथ शिंदे (रा. शहांजापूर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) तसेच सदस्य अरुण शिवाजी गवळी आणि अनिकेत शशिकांत गवळी या तिघांविरुद्ध चोरी, रस्त्यात अडवून मारहाण करणे, चोरी करून नुकसान करणे, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न, मारहाण करून नुकसान करणे तसेच घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तिघांनाही एक वर्षाच्या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीतील सदस्यांकडून पारनेर व नगर तालुक्यातील विविध भागांत नागरिकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून पुन्हा गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी काळात जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणार्या टोळ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा इरादा आहे. शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे, गोवंशीय कायद्याचे उल्लंघन, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हे तसेच वाळू चोरी करणार्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्या विरोधातही हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील आणखी काही सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, आवश्यकतेनुसार त्यांच्याविरुद्धही हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईला वेग आल्याचे दिसून येत आहे.




