मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यभरात पावसाने दडी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. पाऊस लांबल्याने केवळ एक टक्का धूळपेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने आज बैठकीत दिली. शेतकऱ्यांनी पुढील सूचना येईपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिले. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा. पाणी पुरेल याची दक्षता घ्या, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
एल निनो सक्रीय झाल्याने उत्तरेकडील उष्ण वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा आला आहेत. तसेच पश्चिमेकडील वाऱ्याच्या व्यत्ययामुळे आर्द्रतेचा प्रवाह खंडित झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची हालचाल थांबली आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी मंत्रिमंडळाला दिली. २३ ते २८ जून दरम्यान मुंबई आणि किनारी भागात अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला असला तरी तूर्त पावसाची शक्यता नाही. त्यामुळे पेरणीसाठी अनुकूल काळ नसल्याचे सांगण्यात आले.
पाणी जपून वापरा
राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अपुरा असल्याने पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. टंचाई कालावधीमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असेल तरच शेतीला पाणी द्यावेत, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीत दिली. राज्यातील मोठ्या धरणात सध्या ३१ टक्के पाणीसाठा आहे. यात कोयना ९ टक्के, जायकवाडी २९, उजनी शून्य टक्के, भातसा ३२ टक्के, गोसेखुर्द ३४ टक्के, खडकवासला १७ टक्के, अप्पर वर्धा ४४ टक्के, अप्पर वैतरणा ३६, भंडारदरा १९ टक्के पाणीसाठा आहे.
खरीपाच्या पेरण्या रखडल्या
मोसमी पावसाची वाटचाल रखडल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्याची माहिती कृषी विभागाने दिली. राज्याच्या काही भागात भात, सोयाबीन, भूईमुगाच्या होणाऱ्या धूळपेरण्या थांबल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार केवळ १ टक्के धूळपेरणी झाली आहे.
धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती
मोठे प्रकल्प : २४ टक्के
मध्यम प्रकल्प : ३१ टक्के
लघु प्रकल्प : ३१ टक्के




