नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलन सुरु असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची घोषणा केली आहे. मागील तीन आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मोठी घोषणा केली असून आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. “देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही.” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. तसेच, “सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली जाणार आहेत, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.” असे आश्वासन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले आहे. तसेच, “विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही.” असेही ते पुढे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक
जंतर-मंतर येथे 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईचा निषेध करण्यासाठी आज बहुजन वंचित आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या बंदला काँग्रेससहीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. पुण्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्र बंदला सुरुवात होणार आहे. बंद काळात पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणि महाविद्यालयात पाठवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदमध्ये 30 हून अधिक संघटनानी पाठिंबा देऊन सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.
सोनम वांगचुक उपोषणावर ठाम
कॉकरोच जनता पार्टीने सुरु केलेल्या या आंदोलनाला आता ३४ दिवस झाले असून नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ते ठाम आहेत. गेले २६ दिवस सोनम वांगचुक यांचेही उपोषण सुरु असून पोलिसांनी कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करावे, तसेच प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासह अनेक मागण्यांवर तेही ठाम आहेत. मोदी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अशामध्ये गुरुवारी (23 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर पुढे काय होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




