नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पहिलीपासून हिंदी भाषेचा (Hindi Language) तिसरी भाषा म्हणून समावेश करावा या सरकारच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोर्चाची हाक दिली आहे. त्यांच्या या मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने देखील पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता या दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा शनिवार (दि.५ जुलै) रोजी निघणार आहे. या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
त्यानंतर आता राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे. मंत्री भुजबळ यांनी आज (शनिवार) दैनिक देशदूत (Deshdoot) कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देशदूतच्या सहकार्यांशी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासह हिंदी भाषेच्या सक्तीवर देखील भाष्य केले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, “गेली २५ वर्षे मी शिवसेनेत (Shivsena) व २५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. दोघांना जवळून ओळखतो. ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच, पण ते मोर्चापुरते (Morcha) एकत्र आहे, कायमस्वरूपी युती होईल का यावर शंका आहे, असे त्यांनी म्हटले.
हिंदीला विरोध नाही
पुढे ते म्हणाले की, “मी ३५ वर्षे हिंदी प्रचार सभेचा अध्यक्ष आहे. हिंदीचा प्रचार अभिनेतेच जास्त करत आहेत. अमिताभ बच्चन, अमीर खानपासून ते पुष्पा चित्रपटापर्यंत घराघरात हिंदी पोहचून चित्रपट अभिनेत्यांनीच खरी हिंदीची क्रांती केली आहे. विद्यार्थी खेळता-खेळता शिकावेत, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे हिंदीला आपला विरोध नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.





