नवी दिल्ली | New Delhi
मतचोरी आणि निवडणूक हेराफेरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या वतीने आज (दि.१४ डिसेंबर) रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी निवडणुकीतील मतचोरीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर (BJP) हल्लाबोल केला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, ही मतचोरी (Vote Chori) विरोधातील लढाई असून, मोदी सरकारची मतचोरी पडकली गेली आहे. थोड्याच दिवसांत संपूर्ण देशाला याची माहिती होणार आहे. जग सक्तीला नव्हे तर सत्याला बघत असते. मतचोरी म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आक्रमण आहे. मतचोरी करून हे लोक सरकार चालवत आहेत. शेवटी सत्याचाच विजय होणार असून, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आम्ही यावर विजय मिळविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मोदी सरकारच्या (Modi Government) काळात नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू करण्यात आली. युवकांना रोजगार न मिळाल्याने बेरोजगारीचे प्रमाणे वाढले, प्रदूषण वाढले. हे सर्व मोदी सरकारने मतचोरी केल्यामुळे झाले. सरकारने मतचोरी केली नसती तर जनतेने त्यांना पाच मिनिटात सत्तेतून बाहेर काढले असते. हे लोक सत्तेसाठी काहीपण करू शकतात, असेही यावेळी खासदार राहुल गांधी यांनी म्हटले.
मतचोरी विरोधात ५५ लाख स्वाक्षऱ्या
काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, मतचोरीच्या विरोधात देशव्यापी मोहिमेद्वारे पक्षाने सुमारे ५५ लाख स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. राहुल गांधी यांनी पुराव्यांसह मतचोरीचे कसे प्रकार घडत आहेत हे दाखवून दिले आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले. परंतु, सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.या रॅलीनंतर काँग्रेस राष्ट्रपतींना भेटण्याची विनंती करेल आणि ५५ लाख स्वाक्षऱ्या असलेले निवेदन सादर करेल. लोकशाही आणि निष्पक्ष निवडणुकांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन आहे असे त्यांनी म्हटले.




