मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पक्षाच्या वर्धापनदिनापर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या सगळ्या चर्चांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पिंपरी-चिंचवड येथे पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की,”सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असण्याचे कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरु, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार असेल तर आम्हाल मंजूर आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. त्या दिशेने आपल्याला पावले टाकायची नाहीत”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका”, असेही शरद पवार यांनी म्हटले.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, शरद पवार यांच्या या विधानावर बोलताना अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.





