पुणे | Pune
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. आज पहाटे ५.४५ वाजता त्यांनी थेट चाकण चौक परिसरात जाऊन वाहतूक कोंडीची पाहणी केली. पुण्यात वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त आहेत. हिंजवडी आणि चाकण हे आयटी आणि ऑटो हब असून, येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक कोंडी आहे. यावर स्थानिक ग्रामपंचायती उपाय करण्यास असमर्थ असल्याने, उपमुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत मोठी घोषणाच केली आहे.
पुणे जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका होणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. प्रत्येकी पाच लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी महानगरपालिका करण्यात येते, असे अजित पवार यांनी सांगितले.
पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार म्हणाले, ‘आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला आहे. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही’, असे अजित पवार म्हणाले.
कोणाला आवडेल किंवा नाही, तरीही मी करणार असल्याचा इशारा अजित पवारांनी या तीन महापालिका करण्यावर दिला आहे. तसेच चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





