राहाता (तालुका प्रतिनिधी)
राहाता बाजार समितीत सध्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यंदा गवार, शेवगा आणि ढोबळी मिरची यांना बाजारात विशेष मागणी आहे. गवारला प्रति क्विंटल ११,००० रुपये, शेवग्याला १०,००० रुपये आणि ढोबळी मिरचीला ६,००० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे. बाजार समितीतील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
राहाता बाजार समितीत कोथिंबीर, बटाटे, भेंडी यांसारख्या भाज्यांची मोठी आवक झाली आहे. बटाट्याची ३६० क्विंटल आवक नोंदवली गेली असून, त्याला १,५०० ते १,७०० रुपये दरम्यान भाव मिळाला, तर सरासरी भाव १,६०० रुपये प्रति क्विंटल राहिला. भेंडीला १,००० ते ३,००० रुपये, सरासरी २,००० रुपये, तर दुधी भोपळ्याला ३०० ते १,५०० रुपये, सरासरी ९०० रुपये भाव मिळाला.
लिंबूला सरासरी २,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर आल्याला ४,५०० ते ५,००० रुपये दरम्यान, सरासरी ४,७५० रुपये भाव मिळाला आहे. फ्लॉवरला ५०० ते ३,००० रुपये, सरासरी १,७५० रुपये, तर गाजराला सरासरी २,००० रुपये भाव मिळाला आहे. याशिवाय घेवड्याला २,००० ते ५,००० रुपये, सरासरी ३,५०० रुपये आणि घोसाळीला सरासरी ३,००० रुपये भाव मिळाला.
कैरीला बाजारात सरासरी ७,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. लसणाला ४,००० ते ६,००० रुपये, सरासरी ५,००० रुपये, तर काकडीला ५०० ते १,००० रुपये, सरासरी ७५० रुपये भाव मिळाला. कारली आणि कोबी यांना अनुक्रमे १,००० ते २,००० रुपये आणि ५०० ते २,५०० रुपये दरम्यान भाव मिळाले, तर दोन्हींचा सरासरी भाव १,५०० रुपये राहिला. वांग्याला १,००० ते ४,६०० रुपये, सरासरी २,८०० रुपये आणि टोमॅटोला ५०० ते १,५०० रुपये, सरासरी १,००० रुपये भाव मिळाला.
हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,५०० रुपये, सरासरी ३,७५० रुपये, तर पिकेडोरला २,५०० ते ४,५०० रुपये, सरासरी ३,५०० रुपये भाव मिळाला. दोडक्याला २,००० ते ३,००० रुपये, सरासरी २,५०० रुपये, तर तोंडलीला सरासरी १,५०० रुपये भाव मिळाला आहे.
कोथिंबिरीच्या १,४०० जुड्यांची आवक झाली असून, तिला ३ ते १० रुपये प्रति जुडी, सरासरी ६ रुपये भाव मिळाला. मेथीच्या ५०० जुड्यांना १५ ते ३० रुपये, सरासरी २२ रुपये भाव मिळाला. कढीपत्त्याला १० रुपये प्रति जुडी, तर कांदा पातीला १२ ते १५ रुपये, सरासरी १३ रुपये भाव मिळाला. पालक, शेपू आणि तांदुळजा यांना सरासरी १५ रुपये, १० रुपये आणि १५ रुपये भाव मिळाले.
राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (आबा) गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी सांगितले की, बाजारात सध्या भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत असल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. बाजार समिती शेतकऱ्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.





