नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ३ मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात असून, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नीट २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या भ्रष्ट व्यवस्थेने २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. काही विद्यार्थ्यांच्या वडिलांनी कर्ज घेतले, काही विद्यार्थ्यांच्या आईने आपले दागिने विकले, लाखो मुलांनी रात्रभर अभ्यास केला, आणि त्या बदल्यात त्यांना पेपरफुटी, सरकारी दुर्लक्ष आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार मिळाला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
आसाममध्ये पुन्हा एनडीएचं सरकार; हिमंता बिस्वा सरमांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनला आहे
हे केवळ एक अपयश नाही, तर तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. प्रत्येक वेळी पेपर माफिया निसटून जातो, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता, लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्याच मानसिक तणावाचा, आर्थिक बोजाचा आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागेल. जर एखाद्याचे भविष्य मेहनतीने नव्हे, तर पैसा आणि प्रभावाने ठरत असेल, तर शिक्षणाला अर्थ तरी काय उरेल? पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनला आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.
दरम्यान, 3 मे 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेचा पेपर 48 तास आधीच लीक झाल्याची माहिती परीक्षा झाल्यानंतर समोर आली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या वादानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा आता नव्याने घेण्यात येणार असून त्याची तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे.





