नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलांची प्रक्रिया आता आणखी वेगाने सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी सहा राज्यांच्या प्रभारींमध्ये मोठे बदल केल्यानंतर आता AICC सचिवांच्या नियुक्तीसाठी १०० हून अधिक संभाव्य नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या नेत्यांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरु सोमवारपासून सुरु झाली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांच्यासमवेत संभाव्य उमेदवारांशी स्वतः चर्चा करतील. राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. तसेच, दिल्लीतील तीन नेत्यांनाही मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.
सहा राज्यांच्या प्रभारींमध्ये आधीच मोठे फेरबदल
५ सप्टेंबर रोजी काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत सहा राज्यांच्या प्रभारींच्या नियुक्त्या बदलल्या. पंजाबची जबाबदारी सचिन पायलट यांच्याकडे देण्यात आली असून, यापूर्वी ही जबाबदारी भूपेश बघेल यांच्याकडे होती. सुखदेव भगत यांच्याकडे छत्तीसगडची, डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे महाराष्ट्राची आणि पी. व्ही. मोहन यांच्याकडे आंध्र प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सुरजेवाला गुजरातसोबतच कर्नाटकचीही जबाबदारी सांभाळतील. बघेल यांना आता आसामचे प्रभारी करण्यात आले आहे.
७२ वर्षांत पहिल्यांदाच दिल्लीबाहेर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; गुजरातची निवड, विरोधकांकडून सवाल
या प्रक्रियेत विशेषतः तरुण चेहरे, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि प्रत्यक्ष जनसंपर्क असलेल्या नेत्यांना संधी देण्याचा विचार असल्याचे समजते आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यनिहाय संघटना अधिक मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधींची थेट नजर
या संपूर्ण प्रक्रियेत राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य नेत्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या संघटनात्मक कामाचा अनुभव, संबंधित राज्यातील राजकीय प्रभाव आणि पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी केलेले काम याचा आढावा घेतला जात आहे.
काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक फेरबदल सुरू आहेत. जूनमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशासाठी नवीन प्रभारी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता सहा राज्यांचे प्रभारी बदलण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संघटनेतही मोठ्या प्रमाणावर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का? याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पक्षीय सूत्रांनुसार, मुलाखतीची प्रक्रिया अनेक टप्प्यांत घेतली जाईल. यामध्ये संभाव्य नेत्यांचे संघटनात्मक अनुभव, राज्यातील त्यांची उपस्थिती, पक्षासाठी त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य आणि भविष्यात संघटना बळकट करण्याची त्यांची क्षमता या निकषांवर मूल्यमापन केले जाणार आहे. काँग्रेसमधील राष्ट्रीय संघटनात्मक पदांवरील नियुक्त्यांच्या बाबतीत, केवळ राजकीय ज्येष्ठतेपेक्षा कामाचा अनुभव आणि तळागाळातील सक्रियता यांना आता महत्त्वाचे निकष मानले जात आहे.




