नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशात सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे मोठे परिणाम पाहायला मिळत आहे. अशामध्ये, संसदेतदेखील याचे मोठे पडसाद पाहायला मिळाले. गॅस टंचाईवरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांना घेरण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (12 मार्च) सिलिंडर संकटाच्या मुद्द्यावरून लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले.
देशात एलपीजी गॅस तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांमुळे गॅसवर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय संकटात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र, यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून भारतात इंधनाचा आणि एलपीजी गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत सत्ताधाऱ्यांना अनेक सवाल विचारले. या बरोबरच काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, रशियाकडून भारताला तेल घेण्यासाठी अमेरिकेच्या परवानगीचे कारण काय? या मुद्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. याच मुद्यांवरून राहुल गांधींनी आज केंद्र सरकारला सवाल विचारलत ‘आपण कोणाकडून तेल खरेदी करायचं हे अमेरिका का ठरवणार?’, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
“मध्य पूर्वेत युद्ध सुरू आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये हे युद्ध सुरू आहे. या युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. जागतिक तेलाचा २० टक्के पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो ती होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः भारतावरही परिणाम होत आहेत. कारण आपल्याला लागणारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा खूप मोठा भाग हा होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने येतो. भारतातील अनेक शहरांत सध्या गॅसचा तुटवडा जाणवत आहे, तसेच अनेक रेस्टॉरंट्स बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच एलपीजी गॅसबाबतही भिती आहे, ही फक्त सुरुवात आहे”, असे म्हणत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला.
“उर्जा सुरक्षेचा प्रश्न हलक्यात घेण्यासारखा विषय नाही. कारण ही फक्त सुरुवात आहे. प्रत्येक देशाचा पाया हा त्याची ऊर्जा सुरक्षा आहे. आपण कोणाकडून तेल खरेदी करतो, कोणाकडून गॅस खरेदी करतो आणि आपण रशियाकडून तेल खरेदी करू शकतो का? हे ठरवण्याची परवानगी अमेरिकेला देणं चुकीचं आहे. आपण वेगवेगळ्या तेल पुरवठादारांशी आपले संबंध निश्चित करू शकतो. भारतासारखा मोठा देश दुसऱ्या देशाला, दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आपण रशियन तेल खरेदी करावं की नाही? हे ठरवण्याची परवानगी का देईल?”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
लोकसभेत पुन्हा गोंधळ
आम्हाला तेल आणि वायू कोणाकडून खरेदी करायचा हे सांगणारा अमेरिका कोण आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पण यावेळी त्यांच्या भाषणात त्यांनी एपस्टीनचा मित्र असे म्हणताच संसदेत मोठा गोंधळ उडाला, ट्रेझरी बेंचने यावर हस्तक्षेप केला. यावेळी, सभापतींनी राहुल गांधींना व्यत्यय आणत म्हटले, “तुम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी सूचना दिली आहे. कृपया नियमात बोला, कोणालाही नियमांच्या बाहेर बोलण्याची परवानगी दिली जाणार नाही.” यावेळी, विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ सुरु होता.
यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा उल्लेख करत म्हटले की, ज्या विषयावर त्यांनी सूचना दिली होती त्या विषयावर मी त्यांना बोलण्याची संधी दिली. तथापि, विरोधी पक्षाचे जबाबदार नेते असूनही, सूचना न देता इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करणे संसदीय नियमांविरुद्ध आहे. ही पद्धत योग्य नाही. संसद अशा प्रकारे चालणार नाही. संसद नियमांनुसार चालेल. कोणालाही कोणतेही विशेष अधिकार नाहीत.” यावेळी, ओम बिर्ला त्यांच्या खुर्चीवरून उठून आणि निघून गेले.




