राहुरी (प्रतिनिधी)
सध्या देशभरात जनगणना तसेच राज्यात मतदारांच्या विशेष पुन्हा पडताळणीचे काम सुरू आहे तसेच बीएलओ चे काम सुद्धा सुरू आहे सोबतच राज्यात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने नवीन अभ्यासक्रमाचे शिक्षकांचे प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे. त्यातच भर म्हणून राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना आता पोलिस ठाण्यात ‘सरकारी पंच’ म्हणून काम पहावे लागणार आहे. तसे आदेश तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एवढेच नव्हेतर या कामासाठी उपस्थित न राहिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
शिक्षकांनी नेमकं करायचं काय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गोरगरिबांची मुले शिकत असताना या मुलांसमोर शिक्षकांना उभे राहू द्यायचंच नाही असा चंग जणू शासनाने बांधला आहे. एसआयआरच्या कामासाठी महिनाभर शाळातून शिक्षकांना मुक्त केल्याने या शिक्षकांच्या वर्गाचे काय असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आता राहुरी तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक अशा सर्व शिक्षकांना पोलीस स्टेशनला आरोपीच्या जाबजवाबासाठी पंच म्हणून उपस्थित राहण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री कारले यांच्या सहीने सदरचे आदेश शिक्षकांना बजावण्यात आले असून यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे वरील सर्व कामे सांभाळून शिक्षकांना आता पोलीस स्टेशनला पंच म्हणून देखील उपस्थित राहावे लागणार आहे.
शिक्षकांना बजावण्यात आलेल्या आदेशामध्ये पोलीस निरीक्षक राहुरी व गटविकास अधिकारी राहुरी यांच्या संदर्भाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन-२०२६ मधील जुलै-२०२६ करिता राहुरी तालुक्यातील सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन राहुरी येथे गुन्ह्याचे तपासाकामी पंच म्हणून सोबत जोडलेल्या यादी प्रमाणे नमुद दिनांकास नमुद कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासाकामी पंच म्हणुन नियुक्ती असल्याने आपण त्या दिनांकास पोलीस स्टेशन राहूरी येथे पंच म्हणुन आपणास दुरध्वणी आल्यास तात्काळ उपस्थित राहावे आपणास नेमुन दिलेल्या दिनांकास पंच म्हणुन कर्तत्व्य बजावण्याचा दुरध्वणी संदेश आला किंवा नाही नाही या बाबत आपला अहवाल दुसरे दिवशी या कार्यालयास सादर करावा. आपल्या नावासमोरील दिनांकास पोलीस स्टेशन राहुरी येथे तपासकामी पंच म्हणुन आपण उपस्थित न राहिल्यास व पंचनामा करण्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास पुढील कारवाईस आपण जबाबदार रहाल यांची नोंद घ्यावी. सदर आदेश हा जयश्री कार्ले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राहुरी यांचे सहीने काल सर्व शिक्षकांना बजावण्यात आला.
दरम्यान, शिक्षकांना विविध कामे दिल्याने त्यांना वर्गावर थांबण्यास वेळ नसून सदरची कामे करताना शिक्षकांची मानसिकता देखील विचारात घेतलेली नाही याच मानसिक धक्क्यतून परवा पाथर्डी मध्ये एका महिला शिक्षिकेचा मृत्यू देखील झाला आहे. शाळेतील मुलांसमोर शिक्षकच नसतील तर त्या मुलांचं शिक्षणाचे काय असाही प्रश्न आता पालकांनी उपस्थित केला असून पंच म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या केलेल्या नियुक्त रद्द करून इतर खात्यातील लोक ज्यांना जनगणना एसआयआर बीएलओ ही कामं नाहीत अशा लोकांना नियुक्त करण्यात यावे अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी सुद्धा शिक्षकांच्या नियुक्ती या कामे करताना परिस्थितीचे भान ठेवून शिक्षक सोडून इतर खात्यातील कर्मचारी घेणे आवश्यक आहे सध्या जनगणना आणि एसआयआर चे महत्त्वाचे काम सुरू असल्याने शिक्षकांना पंच म्हणून नेमू नये अशी मागणी सुद्धा शिक्षक वर्गातून होत आहे.




