येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील उत्तर- पूर्व भागात आज, वादळी वारा आणि गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील राजापूर, जायदरे, पिंपळखुटे, कुसूर, कुसमडी, कोळगाव परिसरात सुमारे अर्धा – पाऊणतास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कुसूर, कुसमडी, नगरसुल परिसरात गाराही पडल्या. अचानक आलेल्या या पावसाने काढणीला आलेल्या कांदा, मका व गहू पिकाला मोठा फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने अचानक बदल होत आहे. तर सध्या गहूं, कांदा, मका काढणी सुरू आहे. आजच्या अकस्मात पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. काही ठिकाणी काढलेला कांदा तर काही ठिकाणी गहू भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याने शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत.
आधीच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजावर आता, अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी विनोद पाटील यांनी केली आहे.




