मुंबई | Mumbai
सरत्या वर्षाला निरोप देऊन संपूर्ण जगभरात नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. २०२५ या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरवर्षी लाखो लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखादा संकल्प करतात आणि तो पूर्ण करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने मनसैनिकांना शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण सुचना केल्या आहेत. आपल्या पक्षाकडे मतदार मतदानाच्या वेळेस पाठ फिरवत असले तरी मराठी लोकांवर अत्याचार होत असेल तर सर्वात आधी आपणच धावले पाहिजे असे राज यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक्सवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या २५ वर्षांत झालेले बदल, मनसेची स्थापना आणि प्रवास, जनतेच्या कायम राहिलेल्या समस्या, निवडणुकीतील पक्षाचे अपयश, मराठी भाषिकांच्या अडचणी, महिलांवरील अत्याचार, निवडणुकांसाठी नसून लोकांसाठी काम करण्याचे पक्षाला आवाहन अशा अनेक बाबींचा समावेश केला आहे.
राज ठाकरे पोस्टमध्ये काय म्हणाले?
“माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे, कारण या शतकातील, पाव शतक संपायला आले. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळे युग वाटावे,” असे राज ठाकरे म्हणाले. “या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळे आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेले,” असे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
“या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणे. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणे. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणे लावणे. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणे. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमके मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे,” असे राज म्हणालेत.
पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळले. नक्की काय घडले यावर माझे मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझे आवाहन आहे की जे घडले ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केले देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झाले. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत.
असे असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणले तसे मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावले तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच.
पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडले नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगले फोडून काढा.
महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्यांना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालये पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळे करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा.
लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा”, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.