राजस्थान | Rajasthan
राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी रिफायनरीला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. पंतप्रधान मोदी उद्या म्हणजेच २१ एप्रिल रोजी बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथे रिफायनरीचं लोकार्पण करणार होते. आज (20 एप्रिल) सोमवारी दुपारी २ वाजता रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटला (सीडीयू) आग लागली. धूर निघू लागताच कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीच्या एका मुख्य प्रोसेसिंग युनिटमध्ये ही आग लागली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, धुराचे काळे लोट सुमारे एक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतर युनिट्समध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ही आग शॉट सर्किटमुळे लागली की यात घातपाताचा काही संबंध आहे, याचा तपास तांत्रिक टीम आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
ढसा ढसा रडत देवाचा धावा…विमानाच्या ४ तास हवेतच घिरट्या, नेमकं काय घडलं?अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नुकसानीचे प्रमाण आणि आगीच्या कारणांचे मूल्यांकन केले जाईल. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडक पहारा ठेवण्यात आला आहे. पाइपलाइनद्वारे पुरवठा होणारे कच्चे तेल या युनिटमध्ये येते. येथे कच्च्या तेलावर प्रक्रिया करून ते इतर विविध युनिट्सकडे पाठवले जाते. आगीची माहिती मिळताच रिफायनरीमधील अत्याधुनिक इन-हाऊस फायर सेफ्टी सिस्टिम सक्रिय झाली. रिफायनरीच्या परिसरात असलेल्या अग्निशमन दलाच्या शेकडो गाड्या आणि हायड्रंट सिस्टिमनं आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. एचपीसीएलचे तांत्रिक तज्ज्ञांचे पथक सध्या डॅमेज कंट्रोल करत आहे. या संदर्भात अद्याप तरी कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. पण रिफायनरीमधील संवेदनशील यंत्रणांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समजते.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या २४ तास आधी घडलेली दुर्घटना सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. अति संवेदनशील भागात आग लागण्यामागचं नेमकं कारण काय, ही घटा केवळ तांत्रिक स्पार्किंगमधून घडली की सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं घडली, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्या होणाऱ्या भव्य लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळेत बदल केले जाणार का, या कार्यक्रमाच्या स्वरुपात बदल होणार का, हे प्रश्नदेखील कायम आहेत.





