पुणे | Pune
अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे, त्यामुळे त्यांच्या अपघाताची चौकशी ही पारदर्शक व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ज्या लोकांमुळे आपल्याला संसदेत जायची संधी मिळाली त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहा असा सल्लाही त्यांनी पार्थ पवारांना दिला. तुमच्याकडे देखील लोकसभेचा प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून तुम्ही पार्थ पवार यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यत आला होता.
पार्थ पवारांना काय सल्ला दिला?
एक गोष्ट जी आदरणीय पवार साहेबांनी मला सांगितली. ती गोष्ट मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते. राज्यसभेत आणि लोकसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा वेळ येईल बोलायची संधी मिळेल, तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचे. कारण तिथे जे व्यक्ती बसले आहेत, ते आपल्या पेक्षा जास्त जाणतात, आणि संपूर्ण देश आपल्याकडे बघत असतो. त्यामुळे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
संसदेची पायरी चढतो ती संधी फक्त आणि फक्त बारातमी लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली आहे. जोपर्यंत त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहशील तोपर्यंत ही पायरी चढत राहशील असा सल्ला मला शरद पवारांनी दिला होता. तोच सल्ला मी पार्थला, एक आत्या म्हणून देते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला पवार साहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, ती मी या ठिकाणी आवर्जून सांगेल. जेव्हा मी लोकसभेची निवडणूक जिंकली तेव्हा, मी प्रथमच संसदेमध्ये पोहोचले. मी आणि पवार साहेब आम्ही दोघं एकाच गाडीने पार्लमेंटमध्ये जातो. तेव्हा जुन्या पार्लमेंटची बिल्डिग होती. तिथे एक जीना आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो, तेव्हा पवारसाहेब मला म्हटले होते, की ही तू जी सीडी चढते आहेसना ती फक्त आणि फक्त बारामती मतदारसंघामुळेच त्याची संधी तुला मिळाली आहे, त्यामुळे याची कायम जाणीव ठेव. या भावनेशी इमानदार राहा असा सल्ला मला त्यावेळी पवार साहेबांनी दिला होता.




