नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या(AyodhyaRamMandir) दान चोरी प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि मोठे वळण मिळाले आहे. राम मंदिर ट्रस्टमधील दोन सर्वात प्रभावी आणि मुख्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचा खळबळजनक वृत्त समोर आले आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य, चंपत राय(ChampatRai) आणि अनिल मिश्रा(AnilMishra) यांनी राजीनामा(Resign) दिला आहे. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीच्या प्राथमिक अहवालातील कडक शिफारशींनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
अयोध्या येथील राम मंदिरातील चोरीच्या पार्श्वभूमीवर, ट्रस्टचे सदस्य चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. चंपत राय हे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस होते आणि अनिल मिश्रा हे देखील ट्रस्टचे सदस्य होते. विरोधी पक्षाने या प्रकरणात सातत्याने चंपत राय यांचे नाव उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता चंपत राय आणि अनिल मिश्रा या दोघांनीही महंत नृत्य गोपाल दास यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले आहेत.
चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला, याचे अधिकृत कारण अद्याप ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्याकडून वाढलेल्या प्रचंड दबावामुळेच चंपत राय यांना राजीनामा द्यावा लागल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विशेष म्हणजे, या दान चोरी प्रकरणाची चौकशी व्यापक व्हावी, अशी मागणी स्वतः विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी केली होती. “चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांचीही या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, कोणालाही चौकशीतून वगळले जाऊ नये,” अशी आक्रमक भूमिका आलोक कुमार यांनी घेतली होती. दुसरीकडे, विरोधकही सातत्याने चंपत राय यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? असा सवाल करत राम मंदिर ट्रस्टला घेरण्याचा प्रयत्न करत होते.
आठ जणांवर गुन्हे दाखल
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये राम शंकर यादव उर्फ टिनू, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, करुणेश पांडे, अविनाश शुक्ला, मनीष यादव, राम शंकर मिश्रा आणि सुभाष चंद्र श्रीवास्तव यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अपहार, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व आठही आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या आरोपींच्या चौकशीत कोणती धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यामुळेच तर चंपत राय यांना राजीनामा द्यावा लागला नाही ना? या आता चर्चांना उधाण आले आहे. या राजीनाम्यामागचे खरे कारण लवकरच अधिकृतपणे समोर येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
अयोध्येतील राम मंदिरातील दान केलेल्या वस्तूंची चोरी होत असल्याची टीका समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीने केला होता. यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली. त्यांच्या तपासादरम्यान अशी प्राथमिक माहिती मिळाली की, रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल 3,500 कोटी रुपयांच्या मुद्देमालाची नोंद नसल्याचे धक्कदायक बाब समोर आली. श्री राम मंदिरातून दान केलेल्या वस्तूंची कथित चोरी प्रकरणी एसआयटीच्या प्राथमिक अहवालाने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या अहवालात घटनास्थळावरील परिस्थिती, 150 हून अधिक लोकांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज आणि सध्याची व्यवस्था यांचा समावेश आहे. प्रत्येकाच्या भूमिकेचा उल्लेख आहे. पण, कोणालाही थेट जबाबदार धरण्यात आलेले नाही. सविस्तर अहवालातून प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी निश्चित होऊ शकते.




