नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम आशियातील संघर्षामुळे ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’चा वापर करणाऱ्या इंधन पुरवठा मार्गांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या अधिकाऱ्यांनी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही तासांत ही जहाजे मुंबई आणि गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दाखल होतील. भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. तो जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूचा महत्त्वपूर्ण भाग वाहून नेतो.
इराण आणि अमेरिकामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणावर गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा देखील बंद केला आहे. यामुळे अनेक हॉटेल बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता इराणने भारतीय जहाजे सोडण्यास परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.
इराणने भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यावर घातलेले निर्बंध हटवले आहेत. अमेरिका, युरोप आणि इस्रायलमधील जहाजांवर अजूनही निर्बंध कायम आहेत. या भागात हल्ल्यांचा धोका असतानाही हा निर्णय घेण्यात आला आहे. एस. जयशंकर आणि अब्बास अराघची यांच्यातील चर्चेनंतर लगेचच दोन भारतीय जहाजे रवाना झाल्याचे समजतेय.
मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, तपास यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन
होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती मागील ४ दिवसांत हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक जहाजे या ठिकाणी इराणकडून नष्ट केली जात आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला करून जहाजे बुडवली जात असल्याने जगावर ऊर्जा पुरवठ्याचे संकट ओढावले आहे. भारतातही याचे परिणाम जाणवत होते. आता जयशंकर यांच्या कूटनीतीला यश आले असून, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना भारतात येण्यास परवानगी मिळणार आहे.
अमेरिका, युरोप आणि इस्रायलशी जोडलेल्या जहाजांवरील निर्बंध कायम राहतील, परंतु भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करू शकतील, असे इराणने स्पष्ट केले आहे. हे भारतासाठी एक राजनैतिक यश आहे, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील शिपिंग ट्रॅफिक सध्या ९०% ने कमी झाले आहे आणि अनेक देशांचे टँकर अडकले आहेत.
दरम्यान, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने बुधवारी माहिती दिली की, सध्या पर्शियन गल्फ क्षेत्रात २८ भारतीय ध्वज असलेली जहाजे कार्यरत आहेत. यापैकी २४ जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असून त्यावर ६७७ भारतीय खलाशी आहेत, तर ४ जहाजे सामुद्रधुनीच्या पूर्वेला असून त्यावर १०१ भारतीय खलाशी आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेवर सक्रियपणे लक्ष ठेवले जात असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.




