अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौकाजवळील धार्मिक स्थळी तोडफोड केल्याची घटना रविवारी (24 ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास घडली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात तिघांना ताब्यात घेत कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, त्यांना अटक करून सोमवारी (25 ऑगस्ट) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची (28 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
योगेश सखाराम झोंड (रा. धोंडेवाडी रस्ता, वाळकी, ता. अहिल्यानगर), जेसीबी चालक बबलु रामभाऊ पाल (रा. बोरूडे मळा, अहिल्यानगर, मुळ रा. बनारास, उत्तरप्रदेश) व अरूण गोविंद खरात (रा. समता चौक, सावेडी) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील सचिन दारकुंडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. समतानगर, सावेडी), दत्ता गायकवाड (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले. समाजकंटक रविवारी पहाटे 2.45 ते 3.00 वाजताच्या सुमारास घटनास्थळी जेसीबी व दुचाकीवरून आले. त्यांनी धार्मिक स्थळाची तोडफोड करून जाणीवपुर्वक धार्मिक भावना दुखवून दंगल घडवून आणण्याचा व सामुदायिक सौहार्द बिघडवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला.
हा प्रकार पहाटेच काही स्थानिकांच्या लक्ष्यात आला. याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, यासंदर्भात अॅड. वसीम रऊफ खान (वय 35, रा. आनंदी बाजार, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.





