मुंबई | Mumbai
२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनी आणि तपास करणाऱ्या संस्थेवर काही प्रश्न उपस्थित केले होते. आज देखील रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत डीजीसीएच्या AAIB च्या अहवालाची चिरफाड करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
वाचवा वाचवीचा कार्यक्रम मोठ्या व्यक्तीमुळे होतो आहे का?
यावेळी बोलताना रोहित पवारांनी म्हटले की, मी व्हीएसआर किंवा डीजीसीए यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर, डीजीसीए आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट मी करत नाही, मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. वाचवा वाचवीचा कार्यक्रम मोठ्या व्यक्तीमुळे होतो आहे का? असे असेल तर अजितदादांचा घात की अपघात हा तपास योग्य रितीने होणार नाही म्हणून मी बोलतो आहे असे रोहित पवार म्हणाले.
उड्डाणाचे ८५ तास उरले होते असे म्हटले
रोहित पवार पुढे म्हणाले, Learjet 45 XR हा विमानाचा प्रकार आहे. विमान आधी सुरतला गेले होते. इंधन क्षमतेच्या ९० टक्के इंधन विमानात होते. या दोन्हीचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. नंतर या विमानाच्या उड्डाणाचे ८५ तास उरले होते असे म्हटले गेले आहे. प्रत्यक्षात या विमानाच्या उड्डाणाचे ३ हजार तास हे जास्त झाले होते. दृश्यमानता कमी होती हे देखील समोर आले आहे. मुख्य पायलट काहीच बोलत नव्हता ही बाबही समोर आली आहे असे रोहित पवार म्हणाले.
रिपोर्टमध्ये बेसिक गोष्टच चुकली आहे
त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट दाखवत, अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटले की, व्हिडिओ पाहिल्यावर विमान उजव्या बाजूला झुकले नव्हते तर डाव्या बाजूला पडले होते. हे दिसून येत आहे, पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसीक जी गोष्ट आहे, गोळी कुठे लागली हे जर आपण विचारायला गेले, तर डोक्याला लागली की पोटात लागली, जर डोक्यात लागली असेल तर इथे(अहवालात) सांगण्यात आलेय की छातीत लागली, इथे बेसिक निरीक्षण एआयबी या संस्थेचे चुकलेय असे आमचे मत आहे, असेही रोहित पवार म्हंटले.
अहवाल द्यायचा म्हणून दिला
या अहवालात झाडे असे म्हटले आहे, झाडांना विमान धडकले असे म्हटले आहे. पण त्या ठिकाणी फक्त झुडपं आहेत तिथे विमान धडकलेले नाही. इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न. अहवाल द्यायचा म्हणून दिला आहे बाकी काहीही या ठिकाणी दिसत नाही असेही रोहित पवार म्हणाले.
अहवालात इन्वेस्टिगेशन टीमच नाव नाही
झाडांना धडकून विमान खाली पडले असे रिपोर्टमधे लिहीले आहे. मुळात झुडुपला देखील विमान धडकले नाही, AAIB च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमच नाव देखील नाही. यापूर्वी २०२३ च्या मुंबई विमान अपघात प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचे नाव होते. व्हिजिबलिटी कमी होती. आमचे म्हणणे आहे की ॲरोचा मनोज पवार याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्याने व्हिजिबिलिटी ठीक असल्याची माहिती दिली होती.
…त्यामुळे हे विमान अजितदादांना मुद्दाम दिले का? असा संशय
“ॲरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे ॲरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये ॲरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आले पाहिजे” अशी मागणी रोहित पवार यांनी केली. “रिपोर्टनुसार विमान 4915 उडाले. लास्ट मेजर इन्स्पेक्शन २३ मार्च २०२५ रोजी झाले होते. याचा अर्थ हे विमान खराब होते. त्यामुळे हे विमान अजितदादांना मुद्दाम दिले का? असा संशय निर्माण होतो” याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले.
जर्नी लॉग बुकमध्ये व्हिएसआर कंपनी गोंधळ घालायची
“जर्नी लॉग बुकमध्ये व्हिएसआर कंपनी कसा गोंधळ घालायची आणि डीजीसीए त्याला कसा सपोर्ट करायची ते दिसून येईल. शमशाबादला हे विमान जाणार होतं. पण बारामती एटीसीला हे विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवले नव्हते. मेलही केला नव्हता. रिपोर्टमध्ये फक्त बारामती टू बारामती असं उड्डाण दाखवलं आहे” असं रोहित पवार म्हणाले.




