वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील शिवेचा महादेव मंदिर परिसरातील रोहित्र नंबर 3 सात ते आठ दिवसांपासून जळाले आहे. यासंदर्भात स्थानिक शेतकरी यांनी महावितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात जावून वारंवार माहिती दिली मात्र महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून मनमानी कारभार चालविला असल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पवार यांनी केला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हातातोंडाशी आलेले पिके विजेअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील शेतकर्यांनी यापूर्वी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना परिसरात राहित्राच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. यावरून या भागातील महावितरण अधिकारी यांना ऊर्जामंत्री प्राजक्त यांनी कल्पना दिली होती. तरीही महावितरणचे अधिकारी मनमानी कारभार करून शेतकर्यांच्या जिवाशी खेळ खेळत आहे.
तरी परिसरात लवकरात लवकर संबंधित विभागाने रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा परिसरातील शेतकरी तसेच वडाळा महादेव ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सचिन पवार, निलेश पवार, अनिल अनारसे, योगेश पवार, किशोर उघडे, किशोर बानगुडे, नितीन गोंदकर, संदीप गोंदकर, बाळासाहेब दळवी, सुधीर मुंडलिक, प्रशांत वाघ, आप्पासाहेब वाघ यांनी दिला आहे. याच परिसरातील शेतकर्यांचे नियमित बिल भरणा असल्याने जाणून बुजून शेतकर्यांना त्रास देण्याचा संबंधित विभागाचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले आहे.




