अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळातील 25 टक्के राखीव जागावरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा जिल्ह्यात 3 हजार 287 जागांसाठी जवळपास तिप्पट म्हणजे 8 हजार 989 अर्ज दाखल झाले आहेत. आता आरटीई (मोफत) प्रवेशासाठीची लॉटरी सोमवार दि.10 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून साधारण 15 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची शक्यता शिक्षण विभागाच्यावतीने वर्तवण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील 8 हजार 863 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी 14 ते 27 जानेवारीची पहिली मुदत, तर 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अशी दुसरी मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत राज्यभरातून यंदा तब्बल 3 लाख 5 हजार 828 अर्ज प्राप्त झाले आहेत.
अपेक्षित अर्ज आल्यामुळे अर्ज भरण्यास मुदत वाढ न देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवेशासाठी शाळांची नोंदणी झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परिणामी, ज्या मुलांचे प्रवेश आरटीईद्वारे होत नाहीत, त्यांना अन्य शाळांमध्ये देखील प्रवेश मिळणे अवघड होते. परंतु, यंदा 15 फेब्रुवारीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे जून-जुलैपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईद्वारे होणार नाहीत, त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जून-जुलैपूर्वीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर राहणार आहे. दरम्यान, यंदा मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात 3 हजार 287 जागांसाठी 8 हजार 989 अर्ज दाखल झाले आहेत. या दाखल अर्जातून प्रवेशासाठीची लॉटरी उद्या (दि.10) रोजी सोमवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर साधारण 15 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता शिक्षण विभागाच्यावतीने वर्तवण्यात आली आहे.