मुंबई | Mumbai
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरात प्रकरणाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा घात झाला. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना विरोधकांनी चांगलच धारेवर धरले. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अशोक खरात यांना गुरू कसं मानलं याबाबत सर्वकाही सांगितले.
माझ्या परिवाराने गुरु मानले होते
राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. त्यामुळे शिवनिका संस्थान या महादेवाच्या मंदिर ट्रस्टवर मी अनेक वर्षांपासून सदस्य होते. तसेच खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानले होते. त्यामुळेच गुरुपौर्णिमा किंवा महाशिवरात्रीसारख्या कार्यक्रमांना आम्ही सहकुटुंब जात होतो. माध्यमांमध्ये दाखवले जाणारे पाद्यपूजेचे व्हिडीओ 5-6 वर्षांपूर्वीचे आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानतो, पण ती व्यक्ती पुढे जाऊन काय कृत्य करणार आहे किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे, याची आम्हाला सुतराम कल्पना नसते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी स्वतः पोलीस महासंचालक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. परंतु माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले, याचे मला वाईट वाटतेय, असे चाकणकर यांनी सांगितले.
कठोर कारवाई करण्यात यावी
तसेच, ‘या प्रकरणामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या सुनेत्रा वहिनींकडे सोपवला आहे. याबाबतचा पुढचा जो काही निर्णय असेल तो सुनेत्रा पवार घेतील.’, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
खोटी माहिती देणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, १९ मार्च २०२५ रोजी एका वर्तमानपत्रात आलेली बातमी आमच्याकडे आली होती. त्यावर आमच्या समुपदेशन खात्याने त्यांना पत्र लिहिले होते. तसेच आम्ही पोलीस अधिक्षकांनाही पत्र लिहून त्याची माहिती मागवली होती. परंतु, नंतर त्या वर्तमानपत्राने खुलासा केला की, त्यांच्याकडे काहीही माहिती नाही. पण आता त्याच बातमीचा आधार घेऊन माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. तसेच ५ मार्च रोजी मला एका मुलीचा मेल आला. खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात तक्रार केली होती. तोपर्यत खरातचे कुठेही नाव नव्हते, परंतु त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. त्यावर आम्ही कारवाई केली आहे. मात्र २ सप्टेंबर रोजीचा माझा एक फोटो व्हायरल केला जात आहे. त्यावेळी माझ्या हाताला कोणतीही जखम नव्हती. परंतु सातत्याने खोटी माहिती दिली गेली. ही खोटी माहिती देणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार आहे, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.




