शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीत बुधवारी रामनवमी उत्सवाची (Ram Navami Festival) भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली मुंबई, ठाणे व राज्यातील इतर ठिकाणीहून जवळपास 90 पालख्या साईनागरीत दाखल झाल्या असून उत्सवानिमित्त साईबाबा समाधी मंदिर (Saibaba Samadhi Temple) व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावट करण्यात आली तसेच यावर्षी साकारण्यात आलेला मयुरेश्वर देखावाने भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.
साईबाबा संस्थान (Sai Baba Sansthan) व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने साईनगरीत येणार्या पालख्यांचे भव्य स्वागत करण्यात येत असून साई नामाच्या जयघोषाने शिर्डी (Shirdi) नगरी दुमदुमून गेली आहे. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा, प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व अतुल वाघ यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ करण्यात आला.
उत्सवाचे निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी श्रींची माध्यान्ह आरती झाली नंतर मधुसुदन भुवड, मुंबई यांचा साईराम संगीत संध्या कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सायंकाळी विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन साईबाबा समाधी शताब्दी मंडप येथे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी श्रींची धुपारती नंतर पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे, मुंबई यांचा साई भजन हा कार्यक्रम झाला. रामनवमी उत्सवानिमित्त श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर साईबाबांची शेजारती संपन्न झाली.
आज गुरुवारी रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी भाविकांना साईसमाधी दर्शन घेण्यासाठी मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त व्यंकट सुब्रमण्यन, बंगलोर यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, व्दारकामाई मंडळ यांचे वतीने करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व 4 नंबर प्रवेशव्दाराचे आतील बाजूस करण्यात आलेल्या श्रीसाई मयुरद्वार या भव्य काल्पनिक देखाव्याने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेतले आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबई व राज्यातील अनेक भागातून आलेल्या पालखी पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी पहाटे श्रींची काकड आरती नंतर अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी श्रींची पाद्यपुजा व 10 वाजता विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीरामजन्म कीर्तन कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर एक वाजेदरम्यान तुकाराम दैठणकर प्रस्तुत शेहनाई म्युझिाकल इव्हेंट यांचा भक्तीगीत, अभंग वाणी, शास्त्रीय संगीत कार्यक्रम सायंकाळी जागृत कोहली, आग्रा यांचा साईभजन कार्यक्रम, 4 वाजता निशाणाची मिरवणूक त्यानंतर साईबाबांच्या पादुकांची रथातून मिरवणूक होणार आहे. सायंकाळी सात वाजता फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध संगीतकार आनंद मिलींद मुंबई यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होणार असून या दिवशी गुरुवार असल्याने पालखीची मिरवणुक होईल. रात्रौ 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होणार आहे.
या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. त्यामुळे 26 मार्च रोजीची नित्याची शेजारती व 27 मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नसून युद्ध पार्श्वभूमीवर इंधन व गॅस टंचाई निर्माण झाली असताना देखील साईबाबा संस्थाने प्रसादालयात भाविकांसाठी उत्कृष्ट प्रकारची भोजन व्यवस्था केली असून रामनवमी उत्सवानिमित्त राज्यातून येणार्या विविध पालख्या व मोठ्या प्रमाणात साई दर्शनासाठी होत असलेली साई भक्तांची गर्दी यामुळे साईनगरी भक्ती भावाने फुलून गेली आहे.





