मुंबई |प्रतिनिधी| Mumbai
अहिल्यानगर जिल्ह्यातील चिखली (ता.श्रीगोंदा) तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 234 कोटी 13 लाख रुपयांच्या तरतुदीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. साकळाई उपसा सिंचन योजना घोड धरणाच्या जलाशयावरील म्हसे या गावात उभी केली जाणार आहे. म्हसे गाव येथून चार टप्प्यांमध्ये पाणी उचलून ते श्रीगोंदा आणि अहिल्यानगर या दोन तालुक्यातील 32 गावांसाठी वापरता येणार आहे. यामुळे या अवर्षणग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासह सुमारे 9 हजार 600 हेक्टर क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. या योजनेत लाभक्षेत्रात विकेंद्रीत जलसाठे निर्माण केले जाणार आहेत. त्यामध्ये ल. पा. तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे आणि गाव तलावांचा वापर केला जाणार आहे.
या योजनेमुळे सिंचनासाठी 1.60 टीएमसी आणि पिण्यासाठी 0.20 टीएमसी असा एकूण 1.80 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. साकळाई योजनेमध्ये घोड धरणाच्या जलाशयातून म्हसे येथे पंपगृह क्रमांक 1 चे बांधकाम करण्यात येणार आहे. पंपगृह क्रमांक 1 ते 4 आणि वितरण कुंड 1, 2 आणि 3 द्वारे एकूण 4 टप्प्यांमध्ये सुमारे 208.34 मीटर उपसा करुन चिखली आणि घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदामध्ये सोडण्यात येणार आहे. वितरण हौद क्रमांक 2 आणि 3 मधून गुरुत्वीय बंदीस्त नलिका प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील 32 गावांतील 196 तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
जनतेला पाणी देण्याचा शब्द पूर्ण – ना. विखे
दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे म्हणून लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर योजनेच्या सर्वेक्षणापासून ते योजनेच्या सर्व प्रस्तावांना मान्यता देण्याच्या सर्व निर्णयांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. लोकसभा निवडणुकीत योजनेच्या संदर्भात जाणीवपूर्वक राजकारण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, अंतिमतः मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पाणी देण्याचा शब्द पूर्ण केल्याची प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.





