संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील वडगाव पान गावात सहावीमध्ये शिकणार्या बारा वर्षीय विद्यार्थिनीवर एका नराधमाने अॅसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि.17) दुपारी घडली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, विधानसभेतही ही घटना मांडल्यानंतर तत्काळ सरकारने गंभीर दखली घेतली आहे.
सदर विद्यार्थिनी सहावीत शिकत आहे. ती मंगळवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. त्याचवेळी रस्त्यामध्ये दबा धरुन बसलेल्या युवकाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर तो पळून गेला. या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे. तर आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.
या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री यांनी देखील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असल्याची प्रतिक्रिया देत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना विशेष पथक नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनीला सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना देत शासनाच्यावतीने मदत मिळवून देण्याची ग्वाही देखील दिली आहे. याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध करत पोलिसांनी गुन्हेगाराला अटक करावी आणि कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.
तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी लोणी येथे जाऊन मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करत पालकांना धीर दिला आणि संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान, रणखांब येथे लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर चाकू हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच ही संतापजनक घटना घडल्याने सर्वत्र निषेध होत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
विधानसभेतही पडसाद
सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून सदर विद्यार्थिनीला सर्व मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली.





