संगमनेर (प्रतिनिधी)
तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी (दि.५) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जांबुत बुद्रुक, जांबुत खुर्द आणि मांडवे बुद्रुक शिवारात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही घरांवरील पत्रे क्षणार्धात उडून दूरवर जाऊन पडली. त्याचवेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे घरातील धान्य, कपडे, फर्निचर तसेच इतर संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे संबंधित कुटुंबियांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुदैवाने उडालेली पत्रे घराजवळील नागरिकांवर अथवा जनावरांवर पडली नाहीत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.
गारपिट व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी शेती पिकांनाही फटका बसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




