मुंबई | Mumbai
महानगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेपक्ष प्रमुख राज ठाकरे यांची युती लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच रविवारी (दि.५) राज ठाकरे यांनी मातोश्रीला भेट दिली. तर गेल्या तीन महिन्यातील ठाकरे बंधूंची ही पाचवी भेट होती. महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे हे रविवारी पाऊण तास मातोश्रीवर होते. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राज ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, रविवारी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात अर्धा तास राजकीय चर्चा झाली. मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. तसेच मनसे हाही एक राज्यातील प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे याबाबत मी अधिकृतपणे कोणतेही भाष्य करु शकत नाही.
कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी…
तसेच ते म्हणाले, कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी बात बहोत दूर तक चली गयी है. माघारीचे दोर नाही आता. प्रकरण फार पुढे गेले आहे. त्याच्यामुळे कोणी कोणत्या मेळाव्यात काय वक्तव्य केले, आम्ही नंतर पाहू ते कसे एकत्र येतात. तुमच्या छाताडावर पाय रोवून ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहेत. काल ते नक्कीच आमच्या एका कौंटुबिक सोहळ्याला बराच वेळ एकत्र होते. नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले. दोघांमध्ये चर्चा झाली, मी सांगतो त्यांच्यात राजकीय चर्चा झाली. आतातरी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मनस्थितीत आहेत. स्थानिक पातळीवरील प्रमुख नेतेही अंतिम टप्पा गाठलेला आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.”
प्रत्येक महापालिकेची परिस्थिती वेगळी
महाराष्ट्रात मुंबईसह २७ महापालिका आहेत. प्रत्येक जागांबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. प्रत्येक महापालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुण्यासह प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे. कुठे एकासएक, कुठे पॅनेल सिस्टिम आहे, कुठे चार पॅनेल आहेत, तर कुठे रिझर्व्हेशन आहे. या सर्व गोष्टींवर आमच्यात चर्चा होत आहे त्याचबरोबर प्रत्येक महापालिकेतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे. या सर्व बाबींवर आमची चर्चा होत आहे. स्थानिक पातळीवरील प्रमुख नेतेही चर्चा करत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे अस्तित्व काय आहे. या आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. त्याचबरोबर मनसे हाही राज्यातील प्रमुख पक्ष अथाहे. यामुळे महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना सर्वत्र एकच स्थिती नाही याचाही विचार होणार असल्याचे राउत यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





