मुंबई । Mumbai
राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीने चांगलाच धुरळा उडवला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांच्या गणितावरून रस्सीखेच सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर फटकेबाजी केली आहे. “विधान परिषद निवडणुकीत कुणी कुणाचा नसतो,” असे सूचक विधान करत त्यांनी महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणाकडे बोट दाखवले आहे.
महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर खुद्द उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरावा, अशी इच्छा आघाडीच्या घटक पक्षांनी व्यक्त केली आहे. मात्र, ठाकरे गटाकडून अद्याप नावाचा पत्ता गुलदस्त्यात आहे. १२ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी उमेदवार कोण असेल? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे याबद्दलची त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट करतील. उमेदवारी अर्ज भरताना आम्ही तुम्हाला नक्की आमंत्रित करू. सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्हाला पेढेही मिळतील.” मात्र, हे पेढे कोणाच्या नावाचे असतील? या प्रश्नावर त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले की, “भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचेही पेढे तुम्ही खाऊन बघा, केवळ आमच्याच पेढ्यांवर तुमचे लक्ष का?” त्यांच्या या उत्तरामुळे विधान परिषदेच्या उमेदवारीबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
विधान परिषदेची निवडणूक ही नेहमीच ‘घोडेबाजारा’साठी चर्चेत असते. याच मुद्द्यावरून राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “एकनाथ शिंदे हे इतके महान गृहस्थ आहेत की, ते देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी भाजपची मते देखील फोडू शकतात. ही निवडणूक गुप्त मतदानाची आहे आणि इथे सगळे पैशांचे व्यवहार चालतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली मते सांभाळून ठेवावीत,” असा खळबळजनक दावा राऊतांनी केला. या विधानामुळे महायुतीमध्ये अंतर्गत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणावर भाष्य करताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. पश्चिम बंगालमधील सुरक्षा दलांचा वापर आणि मणिपूरमधील जळत असलेल्या परिस्थितीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “ज्या उत्साहात पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालमध्ये निवडणुकांसाठी रॅली काढतात, तशीच हिंमत त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावी. तिथल्या लोकांना धीर द्यावा. पण ते तसे करणार नाहीत, कारण सध्याची लोकशाही केवळ निवडणुका जिंकण्यापुरतीच मर्यादित उरली आहे,” असे राऊत म्हणाले. जिथे जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गरज आहे, तिथे ते नसतात; मात्र जिथे राजकारण करायचे आहे, तिथे सशस्त्र दले तैनात केली जातात, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.





