Wednesday, June 17, 2026
HomeराजकीयSanjay Raut : राजकारणात पक्ष फोडणे, माणसे विकत घेणे ही एक प्रकारची...

Sanjay Raut : राजकारणात पक्ष फोडणे, माणसे विकत घेणे ही एक प्रकारची विकृती; संजय राऊतांचा हल्लाबोल

पुणे (प्रतिनिधी)

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडणे, माणसे विकत घेणे ही एक प्रकारची विकृती आहे. जेव्हापासून या देशात आणि महाराष्ट्रात मोदी-शहांचे राज्य आले आहे, तेव्हापासून राजकारणातील या विकृतीने कळस गाठला आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यात केले. या अन्यायाविरुद्ध जनता लवकरच रस्त्यावर उतरून बंड करेल, असेही ते म्हणाले. खासदार संजय राऊत शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

शिवसेनेतील फुटीच्या चर्चा आणि ऑपरेशन टायगरसारख्या गोष्टींवर भाष्य करताना राऊत म्हणाले, हे ऑपरेशन टायगर काय? ही तर एक प्रकारची विकृती आहे. आम्ही सरळ मार्गाने जन्माला आलेले घटक आहोत. भाजपचे लोक दुसऱ्यांचे पक्ष फोडून, आमदार-खासदार विकत घेऊन स्वतःची सोय पाहतात. पण लक्षात ठेवा, हे डबघाईला आलेले जहाज आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की डुबत्या जहाजात कोण जाणार? त्यांना सांगा, भाजप स्वतःच बुडत चालला आहे. त्यांच्याकडे आता फक्त ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हीच अस्त्रे उरली आहेत. शिवसेनेत कोणत्याही प्रकारच्या फुटीची किंवा खासदारांच्या बैठकीची जी चर्चा आहे, ती केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या नियमित बैठका आहेत, ज्यामध्ये मतदारसंघातील प्रश्न, पाऊस, निधी आणि इतर लोकहिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या १६ वर्षांच्या कार्यकाळाबद्दल बोलताना राऊत यांनी फडणवीसांना घेरले. नेहरूंनी देश घडवला, पण मोदी फक्त रेकॉर्ड मोडण्यावर भर देत आहेत. मोदींची तुलना नेहरू, शास्त्री किंवा राजीव गांधींशी होऊच शकत नाही. मोदी हे क्रूर आणि विकृत नेते आहेत, तर नेहरू हे महान होते, असे राऊत
म्हणाले. तसेच, जर फडणवीस नेहरूंना १९४८ नंतरचे पंतप्रधान मानत असतील, तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेलांनाही देशाचे पहिले कायदामंत्री आणि गृहमंत्री म्हणून स्वीकारले पाहिजे, जे ते स्वीकारत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊत यांनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की, तिथे सरकारी इमारतींमध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवल्या होत्या, मात्र तिथून धूर निघताना दिसला आणि मशीन्स जळाल्या. मात्र, या मशीन जळल्या नाहीत तर त्या जाळल्या गेल्या आहेत. निकाल लागल्यानंतर या घटना घडणे हा योगायोग नसून मोठा घोटाळा आहे, असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी इतक्या मोठ्या फरकाने हरूच शकत नाहीत, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ईव्हीएमच्या वापरामुळे निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक राहिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

राऊत यांनी म्हटले की, निवडणूक आयोग हे केवळ भारतीय जनता पक्षाचे एजंट म्हणून काम करत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा गंभीर काळात लंडनमध्ये बॅडमिंटन खेळण्यात मग्न आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे. त्यांनी असाही दावा केला की, जोपर्यंत मोदी-शहांचे राज्य आहे, तोपर्यंत कोणतीही निवडणूक निष्पक्ष होणार नाही.

विरोधी पक्षांच्या एकजुटीवर बोलताना राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुन्हा मजबूत होणे गरजेचे आहे. जर मोदी कोणाला घाबरत असतील, तर ते राहुल गांधींना घाबरतात. भाजपने स्वातंत्र्याच्या लढ्यात कोणतीही भूमिका बजावली नाही, ते डरपोक आहेत आणि राम मंदिराच्या दानपेट्या चोरीला जात असतानाही मोदी शांत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पुण्यात नागपूरच्या वस्तीगृहातील जातीयवादाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भाजपवर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, आदित्य तरुण आणि सक्षम आहेत, त्यांच्यात पक्ष पुढे नेण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाई यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असून त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त आमदार-खासदार फोडण्यावर आणि सत्तेच्या खेळात आहे, असे राऊत यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील अमली पदार्थ विरोधी कारवाई आणि मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी महिलांवरील कारवाईची दखल घेत पोलिसांच्या कार्याचा आढावा घेतला. अर्थ खात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर खासदार राऊत म्हणाले, हा सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, अर्थ खाते सांभाळेल असा सक्षम माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही. त्यामुळे अर्थ खाते मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवणे यातच राज्याचे शहाणपण आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : नगरसेवकांच्या मतांचे ‘वजन’ वाढले; ‘लक्ष्मी दर्शन’वरच...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानाला अवघ्या काही तासांवर आले आहे.त्यामुळे...