मुंबई | Mumbai
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यामागून यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे ८ खासदार फोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी झालेल्या एका गुप्त बैठकीत राजकीय खळबळ उडाली आहे. परंतु ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी खोडून काढला.
शिंदे ठाकरे गटाच्या खासदारांशी गुप्तपणे सातत्याने संपर्कात असल्याच्या चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीला ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी आठ खासदार उपस्थित होते. बुधवारी रात्री शिंदे यांचा ताफा अचानक वेगळ्या मार्गाने वळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात ही बैठक पार पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊतांनी काय सांगितलं?
संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन जे असते ते एकदाच केले जाते. वारंवार एखाद्या शरीराचे ऑपरेशन होते तेव्हा ते डेडबॉडीचे ऑपरेशन असते. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांच्या पक्षाची डेडबॉडी केलेली आहे. सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे करत आहेत. शिवसेनेचे नऊ खासदार हे एकजुटीने एकत्र आहेत. मी काही नावे वाचली तर मला हसायला आले. हे अत्यंत हास्यास्पद आहे. उद्या माझे नाव टाकतील. आदित्य साहेबांचे देखील नाव टाकतील. या प्रकारच्या बातम्या वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जात आहेत किंवा आम्ही काहीतरी घडामोडी करत आहोत हे दाखवण्यासाठी केले जात आहे. हे चुकीचे असल्याचा पलटवार त्यांनी केला.
त्यांनी संकुचित वृत्ती सोडली पाहिजे
‘देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात मोठी झेप घ्यायचे असेल, त्यांनी संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. कुणाल कामरा विटंबना करत नाहीत. विडंबना करतात. ते उत्तम कवी आहेत, कॉमेडीयन आहेत.विधिमंडळाचा वेळ वाया घालवणे योग्य नाही. विरोधी पक्ष आमदार-खासदार जनतेतून निवडून आले आहेत. खासदारांना निधी मिळत नाही अडचण आहे, मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही तत्व मानतो. म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाच्या खासदारांना सुद्धा मी समान न्याय देईल, अशी भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे. तरच त्यांना मोठी झेप घेता येईल नाहीतर त्यांचे राजकीय अस्तित्व जोपर्यंत केंद्रात मोदी आहेत, तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.





