मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. साधारण ४ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांच्या बंडाने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी एकनाथ शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात आहेत. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री ‘ऑपरेशन टायगर’च्या अनुषंगाने ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या मोठ्या घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे तातडीने मूळ गावी दरे येथे गेले आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
ठाकरे गटाकडे सध्या ९ खासदारांची संख्या आहे. या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ८ खासदारांशी थेट संपर्क साधला आहे. यानंतर ठाण्यात एक गुप्त बैठक बोलावण्यात आली होती. ठाण्यातील एका गुप्त ठिकाणी ही बैठक पार पडली. या बैठकीला ६ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित २ खासदारांनी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चेत सहभाग घेतला.
कोण कोण या बैठकीला उपस्थित होते?
या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित असल्याचे समजते आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे ही उपस्थित असल्याचे समजते.
ठाकरेंच्या खासदारांकडून वृत्ताचे खंडन
या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत दोघांनाही अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. अरविंद सावंत यांनी म्हटले की, मी काही झालं तरी शिंदे सोबत जाणार नाही.
एकनाथ शिंदे दरेगावी
ठाण्यातील या भेटीगाठींनंतर एकनाथ शिंदे गुरुवारी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी पोहोचले आहेत. वर वर हा दौरा स्थानिक विकासकामांचा आढावा घेण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी मोठ्या राजकीय खेळीपूर्वी हा मुक्काम असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही जण याला वादळापूर्वीची शांतता असल्याचे म्हणत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण पक्षाशी इमानदार राहू, अशा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, आता या नव्या भेटीने ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.




