बीड | Beed
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि सहआरोपी सुधीर सांगळेला (Sudhir Sangle)काल रात्री पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. तसेच त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी न्यायालयात (Court) आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात यावी अशी मागणी सीआयडीच्या एसआयटी टीमकडून करण्यात आली. हे तिघेही टोळीने गुन्हे करणारे आरोपी असून संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एक आनंद म्हणून केला आहे, या आरोपीना आता आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे तपासासाठी आरोपींना १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला.
तसेच न्यायालयात युक्तिवाद (Argument) करताना डीवायएसपी अनिल गुजर म्हणाले की,”सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केल्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला”, असे म्हटले.
तर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करतांना म्हटले की, “आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आली आहे. डिजिटल पुरावा प्राप्त झाला असल्याचे पोलीस म्हणत आहेत. आरोपींना केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असे म्हणता येणार नाही”, असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.