हैदराबाद
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागरिकांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले. तेलंगणामध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंधनाच्या वापरात संयम बाळगण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
भारत इंधनाची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. गेले दोन महिने मध्य पूर्वेतील युद्धामुळे नवे संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. देशवासियांवर या संकटाची झळ पोहचू नये यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. नागरिकांवर ओझे पडू नये यासाठी सरकार सारे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेत आहे. मात्र, पुरवठा साखळीवर सतत संकट असेल तर आम्ही किती उपाय केले तरी अडचणी वाढतच जातात. आता देशाला सर्वतोपरी ठेवत आपल्याला एकजूट होऊन लढावे लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
सभेत बोलताना त्यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यावर भर दिला. तसेच विदेशी मुद्रा वाचवण्यासाठी अनावश्यक आयात कमी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. सोने खरेदीवर मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्च होत असल्याने नागरिकांनी पुढील एक वर्ष गरज नसल्यास सोने खरेदी टाळण्याचा विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
यासोबतच खाद्यतेलाच्या वाढत्या आयातीचाही उल्लेख करत मोदी यांनी प्रत्येक कुटुंबाने तेलाचा वापर मर्यादित ठेवण्याचं आवाहन केलं. “तेल कमी खाल्ल्याने आरोग्यही चांगलं राहील आणि देशाचाही फायदा होईल,” असं ते म्हणाले.
कोरोना काळात सुरू झालेल्या वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंग पद्धती पुन्हा मोठ्या प्रमाणावर वापरण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. इंधन बचत आणि खर्च नियंत्रणासाठी अशा पर्यायांचा उपयोग होऊ शकतो, असं मोदी यांनी नमूद केलं.
शेतकऱ्यांनाही त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं. यामुळे शेतीची गुणवत्ता टिकून राहील आणि आयातीवरील खर्चही कमी होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.




